Saturday, 24 December 2016

लेखाजोखा

उजाडता एक दिवस
मी मागे वळून पाहतो...
सरत्या वर्षाचा लेखाजोखा
न ठरवता मांडतो...
जोडलेली तोडलेली नाती
गावाकडची माती
भेटलेली सुटलेली माणसे
शेतातील कणसे
बांधलेली तुटलेली घरे
नक्षीदार दारे
गोड कडू आठवणी
लेकीची पाठवणी
सोप्प्या अवघड परीक्षा
विनाकारण शिक्षा
पुऱ्या-अपुऱ्या कथा
संसारातील व्यथा
उरले सुरले प्रश्न
यशापयशाचे जश्न
डोळ्यासमोर झरझर
एक पट उलगडतो
उगवत्याचे स्वागत करायला
मावळत्याला निरोप देतो...
~ मेघा

Thursday, 1 December 2016

शोध क्षितिजाचा

ठराव पास होतो एक तिच्या मनात,
सुरु होतो प्रवास दूरच्या देशात...
गर्दी-आवाज-कुजबुज-कोलाहल सर्वांच्या पार,
मागे पडत जातात मनीचे असंख्य विचार...
शहर सुटले की मोकळे दिसतात रस्ते,
निसर्गाच्या सानिध्यात मनही होते रिते...
नव्या प्रदेशात सगळे अनोळखी चेहरे,
गावात-रानात-दुकानांत होतात तिचे दौरे...
आता हे नवे चेहरे खुलू लागतात,
दुसऱ्या-तिसऱ्या भेटीत ओळखीचे वाटतात...
चहाच्या एका कपात मिळतो मायेचा ओलावा,
दोन क्षणांच्या भेटीत लाभतो आपुलकीचा ठेवा...
शेवटी नकोशी वाटणारी तरीही अटळ,
समोर उभी ठाकते ती निरोपाची वेळ...
निरोप घेतला जातो पुन्हा भेटण्यासाठी,
किंवा पुन्हा कधीच न भेटण्यासाठी...
जडावलेले पाय, डोळ्यांत दाटलेले आसू,
तरीही तिच्या ओठांवर कायम एक हसू...
पाठीवर टाकून अनुभवांच्या शिदोरीचे गाठोडे,
नव्या क्षितिजाच्या शोधात नवा प्रवास पुढे...
~ मेघा निकम

Thursday, 6 October 2016

सफर: कास पठार

                प्रत्येक ठरलेला कार्यक्रम पूर्णत्वास जातोच असे नाही आणि कॉलेज संपल्यावर पुन्हा एकत्र भेटून फिरायला जाणे म्हणजे थोडे कठीणच. कोणाला सुट्टी नाही, कोणाला घरी जायचे आहे, कोणाची परीक्षा,कोणाला घरचे जाऊ देत नाहीयेत असे कोणाचे काय तर कोणाचे काय! आणि सगळ्यांनी आलेच पाहिजे असा आपला हट्ट.. मग दोन-चार वेळा असे ठरवलेले प्लॅन रद्द होत गेले की हट्ट सोडावा लागतो आणि जेवढे जमतील त्यांना तरी भेटू म्हणून मग दोघं-चौघं भेटणे सुरु होते. तरीही आमची जवळपास सात- आठ महिने रखडलेली मुंबई दर्शनची योजना पार पडली आणि तिथेच कास ट्रीपचा मुहूर्त ठरला. तोही दोन आठवडे पुढे ढकलला गेला आणि शेवटी परवाच्या शनिवारी आम्ही भेटलोच. मी नाही आले तरी तुमची ट्रिप कॅन्सल करू नका म्हणत मीच साताऱ्यात पहिल्यांदा दाखल झाले, होय नाही करत चंचल, शितल आणि अब्दुल आले, आणि फिक्स येणारच होते असे संकेत आणि ऋतुराज मुसळधार कोसळणाऱ्या पावसातच पुण्याहून निघाले. तशाच पावसात बसेस मिळत नसल्याने रखडत रखडत मजल दरमजल करत सायली आणि अमोलही रात्री साताऱ्यात हजर झाले. संकेतच्या घरी चहा आणि भजी, नंतर अजिंक्यला जेवण आणि रात्री आईस्क्रीम पार्टी!    

                   रविवारी सकाळी सुपनेकरांच्या नाश्तासेंटर मध्ये गरमागरम पोहे खाल्ले. आणि ५ गाड्यांवर ९ जण निघालो. कासची सफर करायला.... 

"सहज सोप्पे या उन्हाचे त्या धुक्याला बिलगणे
हे असे माझे तुझे अन त्या ढगांवर चालणे" 
अशा रोमँटिक मूड मध्ये सातारा ते कासचा प्रवास दुचाकीवरून केला. (रोमँटिक मूड असला तरी चंचलसोबत प्रवास केला ही गोष्ट वेगळी) इतके सुंदर दृश्य होते,  अक्षरशः ढग डोंगराच्या पायथ्याशी येऊन बसलेत असे  दिसत होते. 

           
थंडगार वारा, सगळीकडे दाटलेले धुके आणि मोकळा रस्ता! धरणीमाता हिरवा शालू नेसून नटलेल्या नववधूसारखी सुंदर दिसत होती.. कसलीही मरगळ, थकवा पळून जाईल इतके छान वातावरण! कोणी मागे कोणी पुढे असे करत आणि आलटून पालटून गाडी चालवत पठारावर पोहोचलो. 


पठारावरची इवली इवली छोटी फुले...थोडे मोकळे आकाश असेल, पावसाने उघडीप दिली आणि सूर्याची किरणे डोकावू लागली की दूरवर पाहावे तिकडे फुलेच फुले दिसतात हा अनुभव मला मागच्या वेळी आलेला पण यावेळी दिवसभर पाऊसच होता. थोडावेळ फिरलो त्यात आभाळी, तेरडा, सोनकी, अबोलिमा, टोपली कारवी, सीतेची आसवे/ निळी पापणी अशी काही फुले पाहिली शिवाय अजून काही ज्यांची नावे माहित नाहीत तीही पाहिली. कारवीची फुले दर सात वर्षांनी फुलतात हे काही दिवसांपूर्वीच समजले त्यामुळे ती यावर्षी पाहता आली याचा खूप आनंद वाटला. नेत्रसुख घेतलेच आणि आठवणी म्हणून कॅमेऱ्यात बंदिस्तही केली.


                  पोहोचल्यावर झालेली चुकामुक, तिथे चॉकोलेटच्या बदल्यात फोटोला पोझ देणारा  छोटा दोस्त, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी...गारठून गेल्यावर मधेच घेतलेला चहा...मित्रांच्या गप्पा आणि चेष्टामस्करी, तलावावरचा गारठा आणि तिथे घेतलेला गवतीचहा, वडापाव, भजी आणि पुन्हा चहा... सगळेच अविस्मरणीय!

                 कासहून परतीची वाट लवकर धरली कारण पुढे सज्जनगडला जायची माझी खूप इच्छा होती. साताऱ्यात कित्येकदा जाणे झाले पण सज्जनगड अजून पाहिलाच नाही अशी खंत यावेळी सोबत घ्यायची नव्हती. दुपारी तीनच्या दरम्यान आम्ही सज्जनगडला जायला निघालो. तिकडेही मोकळा रस्ता, आजूबाजूचे हिरवे सौंदर्य डोळ्यात साठवत गडावर पोहोचलो. चढताना अकरा मारुतींचे आणि गडावर श्रीरामांचे तसेच समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेऊन, घरून आणलेल्या शिदोरीवर ताव मारून आता शहराकडे मोर्चा वळवला. (दुसऱ्या दिवशी साताऱ्यात दुसरा मोर्चा निघणार होताच पण त्याचा आणि आमच्या या मोर्चाचा संबंध फक्त रात्री पुण्या-मुंबईला जाणाऱ्या गाड्यांच्या कमतरतेपुरता जाणवला.)
साताऱ्यात येऊन आम्ही चारभिंती ला गेलो. उंचावरून दिसणारे संपूर्ण शहराचे विहंगम दृश्य अतिशय विलोभनीय...

इथे येऊन थोडे निवांत बसलो... एक दिवसासाठी का असेना पण दैनंदिन आयुष्यातून असा वेळ काढून मित्रांना भेटलो, निसर्गाच्या सानिध्यात गेलो की बरे वाटते. अजून काही दिवसांसाठी पुन्हा रहाटगाडग्यात रमायला मनाची तयारी होते, आणि याच मित्रांसोबत पुढची योजना मनात आपली बैठक जमवू लागते.


पुढच्या ट्रिपची आखणी होईपर्यंत या आठवणींमध्ये रमू... त्यासाठी काही हसऱ्या क्षणांचे हे कोलाज!

Thursday, 18 August 2016

सहजीवन

१५-२० दिवसांपूर्वी आमच्या शेजारचे एक आजोबा गेले. तसे आजारीच असायचे आणि बरेच थकलेलेही होते. घरी फोन व्हायचा तेव्हा मी कधीच त्यांची चौकशी केली नव्हती. नेमकं त्या दिवशी आई सांगत होती की नारळपाणी पिऊनच त्यांची तब्येत सुधारली होती वगैरे...आणि आमचे एवढे बोलणे झाले त्याचदिवशी दुपारी ते निर्वतले. तसे त्यांच्याबद्दल लिहावे अशी त्यांची माझी ओळखही नाही, किंवा त्यांची ख्यातीही नाही. पण आज सहज विचार आला तो त्यांच्या बायकोचा. त्यांच्या दुसऱ्या बायकोचा.
आजोबांना दोन बायका. पहिलीला सहा मुली झाल्या, मुलगा होईना म्हणून दुसरीशी लग्न केले. त्यानंतर मुलगा झाला पण तो पहिल्याच बायकोला. दुसरी आजोबांची लाडकी होती, पण तिला मूल झालेच नाही. मुलींची लग्न झाली, मुलगा आपल्या आईला घेऊन वेगळा राहायला लागला, कारण वेगळे काय असणार? कौटुंबिक कलह! पण कसल्याशा तडजोडीने ते मिटले असावेत.  काही दिवसांनी आजोबाही आले दुसऱ्या बायकोसोबत  यांच्याकडेच राहायला. मुलाचे लग्न झाले पण सुनेचे दोघींशीही फार काही पटले नाही कधीच. पण आम्हाला दया यायची ती पहिल्याच बायकोची. बिचारी थकलेली पण स्वभावाने गरीब, दिवसभर राबायची. तिचे दुखनेखुपणे कोणी पाहत नव्हते. आमच्याघरी येऊन कधीमधी आईकडे मन मोकळे करायची. आमच्या घरी येणे जाणे असायचे, विचारपूस व्हायची.
दुसऱ्या बायकोशी मात्र आमचा संवाद कमीच. कामापुरते काम. आपल्याकडे आधीच दोन लग्ने झालेल्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि त्यातून दुसऱ्या बायकोचा तर दुस्वासच जास्त. पण का कुणास ठावूक.. आजोबा गेले आणि दुसऱ्या बायकोबद्दलच मला जास्त वाईट वाटू लागले. पहिली थकलेली आहे, वृद्ध आहे. तिचेही आयुष्य आता फार नाही राहिले शिवाय तिला स्वत:च्या पोटच्या मुली, मुलगा नातवंडे आहेत. उरलेसुरले आयुष्य काढेल ती कसेही. पण नवरा गेल्याचे दु:ख दुसरीला किती झाले असेल कल्पना करता येणार नाही. एकतर घरात जिवाभावाचा माणूस तेवढाच आणि अर्धे आयुष्य सरले असले तरी उरलेलेही खूप आहे. पोटचे एखादे मूल असते तर त्याच्याकडे पाहत दिवस काढले असते. पण आता किती म्हटले तरी थोरलीच्या पोरी लावतील का जीव आपल्याला? नवऱ्याचा धाक घरात नसला तरी अस्तितवानेही फरक पडतो. तो असताना जो मान होता तो राहील का पुढे? आपल्या जन्माचे प्रयोजन काय हा प्रश्न सतावत असेल ना तिला आता!  

बहिण- भावाचं नातं



माझ्या आजीच्या जात्यावरील ओव्यांमध्ये बहिण- भावाचं नातं सांगणाऱ्या ओळी सापडल्या..त्या सादर करायला आजच्याइतका चांगला दुसरा मुहूर्त नाही.
इठू सावळा बंधू येवो
म्या का देखली दरवाज्यात,
हाती चंदनाचा पाट
झारी बुडविली रांजणात,
बंधूच्या भोजनाला
जिरं-साळीचा करती भात,
हिंग-जीऱ्याचं तिखट
भाजी यीळती तीनशे साठ,
झालं बंधूचं भोजन
चंद्रभागेचं पाणी टाक,
हातही पुसायला
शेला धुवट बारीक,
पिकल्या पानाचं देठ तोडी
चिकणी सुपारी चिकट,
दारी दवण्याचं झाड
चुना कळीचा तिखट,
गेला मातेला सांगत
बहिण असावी जलमात...
सर्व बहिण भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!!

Monday, 18 July 2016

Code मंत्र

परवा "CODE  मंत्र" हे मराठी नाटक पाहिले. code मंत्र पाहिल्यावर मी काही वेळ सुन्न झाले होते. काही नाटके नाट्यमंदिरात पाहिल्यानंतरही त्यांचा प्रभाव पुढे अनेक दिवस टिकून राहतो त्यापैकीच हे एक नाटक. मला विलक्षण आवडलेले.. आणि अस्वस्थ करणारे तरीही विचार करायला लावणारे....
"A few good men" या मूळ इंग्रजी नाटकाची प्रेरणा घेऊन सध्या गुजराती भाषेत चालू असलेल्या नाटकाचे हे मराठी रूपांतर... नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन, अभिनय,संवाद, पार्श्वसंगीत, कथा अशा सर्व बाजूंनी परिपूर्ण असलेली विलक्षण अद्भुत कलाकृती... मी काही चित्रपट-नाटकांची समीक्षक नाही पण मला नाटक पाहायला आवडते आणि आवडलेलं नाटक इतरांनीही पाहावं असं मला नेहमी वाटतं. म्हणून हा लेखप्रपंच...
(छायाचित्र सौजन्य: Code Mantra-Marathi च्या फेसबुक पेजवरून )

सैनिकांची शिस्त, शौर्य, देशभक्ती, त्याग आणि सर्वस्व वाहून केलेली देशसेवा आपल्याला परिचित असते. किमान आपण त्याबद्दल ऐकून असतो. त्यांची कर्तव्यनिष्ठा वाखाणण्यासारखी असते पण कर्तव्याचा अतिरेक झाल्यावर काय घडू शकतं याची ही एक कथा... कर्तव्यपूर्तीमध्ये नाती बाजूला ठेवून नियमांचे पालन करताना व्यक्तीला कोणत्या दिव्यातून जावे लागते हे या कथेत पाहायला मिळते. नाटक पाहायला सुरुवात होण्याआधीच पार्श्वसंगीतामुळे आपण थेट मराठा रेजिमेंटच्या तळावर दाखल होतो आणि पडदा उघडताक्षणीच समोर दिसतो तो भव्य सेट. प्रसंगांची गुंफण इतकी सुंदर आणि अंधार न करता सेटची प्रसंगानुरूप अलगद आणि तितक्याच शिस्तीत आखणी केली आहे की एक क्षणही आपण कथेपासून विचलित होत नाही. कथेतील वकील अहिल्या देशमुख (मुक्ता बर्वे) एका सैनिकाच्या खुनाची केस उलगडून आरोपीला सोडवू पाहत असताना एकेक धागादोरा असा पकडतात, त्यातून प्रेक्षकांची उत्कंठा वाढत जाते.


(छायाचित्र सौजन्य: Code Mantra-Marathi च्या फेसबुक पेजवरून )
एकामागोमाग एक नवनवीन धक्के आपण पचवत जातो आणि शेवटी मिलिटरी लॉ एक्स्पर्ट अहिल्या देशमुख आणि कर्नल प्रतापराव निंबाळकर यांच्या जुगलबंदीतून सत्य बाहेर येते. कोर्टमार्शल होताक्षणीच एक शेवटचा जबरदस्त धक्का बसतो आणि आपण सुन्न होतो. कथा आणि कथेचा शेवट सांगितला तर पाहण्याची मजा नवीन प्रेक्षकांना अनुभवता येणार नाही म्हणून सांगण्याचा मोह आवर्जून टाळतेय; पण या वर्षातील आणि आत्तापर्यंतचे मी पाहिलेले हे सर्वोत्तम नाटक आहे हेही खरे.   नाटकातील प्रत्येक पात्राची भूमिका महत्वाची आहे आणि ती सर्व पात्रे तितकीच खरी वाटतात. अजय पुरकर आणि मुक्ता बर्वे यांची कामे तर लाजवाब आणि बिनतोड...
एक थरार नाट्य आणि नाट्यकलेची उत्कृष्ठ कार्यशाळा म्हणून हे नाटक प्रत्येक रसिक प्रेक्षकाने आणि अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक सर्वांनी आवर्जून पाहावे असेच आहे.     

Tuesday, 14 June 2016

प्रेषित

भूतकाळात अडकून न पडता वर्तमानात जगायचे आणि भविष्याची आखणी करायची असं मनाला  कितीही समजावलं तरी वर्तमानात काही गोष्टी अशा घडतात, अशा पद्धतीने समोर येतात की आपण नकळत भूतकाळात डोकावतो. असेच काहीसे झाले आज…
"प्रेषित", १९८३ साली प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी लिहलेली ही विज्ञानकादंबरी. 
"पृथ्वीप्रमाणेच दुसऱ्या कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी असेल का याचा गुप्तपणे शोध घेत असताना एका शास्त्रज्ञाच्या हाती लागलेली माहिती, त्याचा अपघाती मृत्यू, आणि त्याने त्या परग्रहावर पाठवलेल्या संदेशातून पुढे चाळीस वर्षांनंतर घडलेल्या घटना" नाट्यमय पद्धतीने रंगवल्या आहेत. वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहेच शिवाय १९८३ सालात कल्पना केलेल्या भविष्यात होऊ शकतील अशा कितीतरी गोष्टी आज २०१६ मध्ये खऱ्या वाटतात. मला खरोखर ही कादंबरी यासाठी आवडली की सामान्य माणसाला समजेल अशा रीतीने प्रसंगांची, वैज्ञानिक संकल्पनांची मांडणी केली आहे. ही कादंबरी वाचून पूर्ण झाली आणि मला आठवले… 

मी नववीत होते तेव्हा एका परीक्षेमार्फत जिल्ह्यातून शंभरेक मुलांची निवड "विज्ञानमंच" या आठ दिवसांच्या कार्यशाळेसाठी झाली होती. सातारा जिल्ह्यातील त्या मुलांमध्ये मीही एक होते. माझ्यासह एकूण पन्नास मुलामुलींसाठी हे निवासी शिबीर होते. बाकीचे साताऱ्याच्या जवळपासचे (सातारा तालुक्यातील) असल्याने ते त्यांच्या घरूनच ये जा करत. त्यावेळी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज मध्ये ही कार्यशाळा चालू होती. आणि बी. एस्सी, एम एस्सी चे प्राध्यापक आम्हाला वेगवेगळे विषय शिकवत आणि प्रयोगाची प्रात्यक्षिकेही देत होते. या कार्यशाळेत आम्हाला विज्ञान शाखेतील अनेक विषयांची तज्ञांकडून ओळख करून दिली गेली. अनेक वैज्ञानिक प्रयोग स्वत: करायला मिळाले. तिथे मार्गदर्शन वर्ग चालू असताना आम्हाला बसल्या जागी चहा बिस्कीट मिळत असे याचे कोण कौतुक वाटायचे! एवढी Special treatment त्याआधी कुठेच मिळाली नव्हती. त्या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनाच्या भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हाला उद्देशून म्हणाले होते "you are the cream of society" आजही ते शब्द आठवले की अंगावर मुठभर मास चढल्यासारखे वाटते.

सांगायचा मुद्दा हा होता की त्या कार्यशाळेतून एक दिवस आयोजक आम्हाला डॉ. जयंत नारळीकरांचे व्याख्यान ऐकायला घेऊन गेले. ते खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत हे आधीच सांगितले होते. त्यामुळे आम्ही चूपचाप जाऊन व्याख्यान ऐकत बसलो. त्यावेळी त्यांनी काय सांगितले ते आता फारसे लक्षात नाही (किंबहुना आठवत नाहीच). पण एका विज्ञानकादंबरीचे नाव "कृष्णमेघ" (The Black cloud) लक्षात राहिले आणि त्यांनी दिलेला पत्ता "आयुका, पुणे-७" असा वहीत लिहून ठेवलेला. ती वही रद्दीत गेली पण पत्ता लक्षात राहिला. पुढे मी अनेकवेळा फलटणला पुस्तक प्रदर्शन भरले की त्यात ते "कृष्णमेघ" मिळते का शोधत राहायचे. अनेक पुस्तके वाचली पण हे काही मिळाले नाही. मी हळूहळू ते विसरून गेले. मग मागच्या वर्षी मी जेव्हा इंटरनेट वापरून पुस्तकांची ऑनलाइन खरेदी करायला लागले तेव्हा या पुस्तकाची आठवण झाली. मी पुन्हा शोध सुरु केला पण माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट अर्धीच खरी होती. मला त्या कादंबरीचे लेखक डॉ. नारळीकर आहेत असे वाटायचे. मला ती कादंबरी काही केल्या मिळत नव्हती. मग मी असेच एकदा दादरच्या पुस्तकांच्या दुकानात गेले तिथे मला डॉ. नारळीकरांचे विज्ञानकथांचा संग्रह असलेले "यक्षांची देणगी" पुस्तक दिसले. मी ते खरेदी केले आणि त्याची प्रस्तावना वाचताना मला हे समजले की The black cloud ही फ्रेड हॉयल यांनी लिहलेली कादंबरी आहे आणि ते डॉ. नारळीकर यांचे डॉक्टरेटचे मार्गदर्शक होते. आता मला ती कादंबरी नक्कीच मिळेल. आज 'प्रेषित' वाचली, आणि ती आवडली. आता "कृष्णमेघ"ही आवर्जून वाचेन. 

Friday, 10 June 2016

एक छोटीशीच भेट...

आज पहाटे डेहराडून एक्स्प्रेसमधून बोरीवली स्टेशनला उतरले. ३:५० ची चर्चगेट लोकल उभीच होती. पाठीवरील मोठे ओझे पाहून मागे लागलेल्या रिक्षावाल्यांना चुकवून लोकलचे तिकीट काढून मी महिलांच्या डब्यात चढले. डब्यात तीन बायका, सुरक्षा पोलीस आणि मी एवढीच माणसे. त्यातील एक 'म्हातारी बाई' आधीच झोपलेली होती. दुसऱ्या दोघी कुठूनतरी लांबून प्रवास करून आलेल्या आणि आता अंधेरीला उतरणार होत्या.
मला हे माहित झाले कारण त्या दोघींपैकी एक साधारण ६०-६५ वर्षांची असेल माझ्याकडे येऊन विचारत होती की "ही ट्रेन अंधेरीला जाईल ना?"
  मी 'हो' म्हटले तरी ती माझ्यासमोरच बसून राहिली.
काहीतरी बोलायचे म्हणून मी विचारले, "एकट्याच कुठे गेला होता?"
त्यांना बहुतेक ऐकू कमी येत असावे. त्यांचे असंदिग्ध उत्तर ऐकून मी पुन्हा दोनदा विचारले. शेवटी त्या म्हणाल्या "एकटी नाही, आईला घेऊन चालले." एवढे बोलून ती उठली आणि तिच्या आईजवळ गेली.
 मी क्षणभर विचारत पडले. ज्या बाईला स्वत:लाच आता प्रवासात तिच्या मुलांनी किंवा कोणीतरी सोबत करायची गरज आहे, ती आईला सांभाळत आहे. तिची आई अतिशय वृद्ध आणि कृश दिसत होती.

मी पुन्हा काही क्षण डब्यात नजर फिरवली. झोपलेल्या 'त्या' म्हातारीकडे पाहिले. ती शेवटच्या स्टेशनवर उतरणार असेल असा अंदाज बांधला. ट्रेन निघायला आणि मग दादरला पोहचायला वेळ लागणार होता. पहाटेच्या शांततेत रेल्वेच्या सूचनांचा आवाज जरा जास्तच मोठा वाटत होता. मग मीही रिकाम्या बाकावर आडवी झाले. दिल्लीपासून ३० तास सलग केलेल्या प्रवासाने थोडा थकवा आलेला होताच आणि पहाटे साडेतीनला उतरायचे असल्यामुळे आणि सोबत कुणीही नसल्याने अर्थातच रात्रभर नीट झोपू शकले नव्हते. ट्रेन निघाली, मी आडवी होऊनही सावध झोपले होते. पुढील स्टेशन कांदिवली, मालाड, गोरेगाव अशा सूचना कानावर पडतच होत्या. अंधेरी स्टेशन आले तेव्हा एकदा उठून बसले. त्या दोन आज्जी त्यांच्या पिशव्या घेऊन उतरल्या. ते पाहिले आणि मी पुन्हा आडवी झाले. डोळा केव्हा आणि कसा लागला ते अजूनही आठवत नाहीये. पण "पुढील स्टेशन एल्फिन्स्टन रोड' कानावर आदळले आणि मी खाडकन जागी झाले. 'छे! आधीच वैतागले आहे आणि पुन्हा दादरसाठी दुसरी ट्रेन पकडून मागे जावे लागणार.' पटकन सामान उचलले आणि उतरले. तेव्हा माझ्यासोबत ती झोपलेली आज्जीही उतरली होती. 'मी चुकून जरी या स्टेशनवर आले असले तरी माघारी जाण्यासाठी एक तिकीट घ्यावे लागणार' हा विचार चारदा आला पण कंटाळा, आळस आणि बेपर्वाई या गोष्टींनी त्यावर मात केली. माझ्यासारखेच असे किती विनातिकीट प्रवास झाले असतील ज्याची कुठेच नोंद नाही. तिकीट न घेताच मी उलट दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत एका बाकावर बसले.

तेवढ्यात गोड आवाजात आणि मिश्किल हसत ती आज्जी म्हणाली, "मला दादरला उतरायचे होते पण जागच आली नाही."

मी तिच्याकडे पाहिले, ती स्मितहास्य करत होती, मीही हसले, म्हटलं "अहो, मलाही तिथेच उतरायचे होते."
दोघी एकमेकींकडे पाहून हसलो. त्यांच्या हातातल्या पिशवीकडे मी नकळत पाहत होते.
मी काही विचारण्याआधी त्या स्वत:च म्हणाल्या "भाजी घेऊन जायचंय."
पिशवीचा आकार लक्षात घेऊन मी म्हटलं "विकण्यासाठी का?"
त्यांनी होकारार्थी मान डोलावली. मी पुढे विचारलं "कुठे विकता?"
म्हणाल्या "दादरला घेते आणि बोरिवलीला नेऊन विकते."
मी पाहत राहिले. ६०-७० वर्षाची बाई. चेहऱ्यावरील सुरकुत्याच तेवढे वय दर्शवत होत्या. गळाबंद आणि कोपरापर्यंत लांब बाह्या असलेला ब्लाउज, साडीसारखे काहीतरी (पण साडी नक्कीच नाही) कापड अंगभर गुंडाळलेले, मान मागे पुढे डुलते आहे. साधारण साडेचार फूट उंची, पाठीला थोडासा बाक, आवाज अतिशय गोड आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य, प्रसन्न आणि तेजस्वी मुद्रा.  पहाटे चारच्या ट्रेनने प्रवास करून रोज भाजी विकते. दिवसाला ७०-८०रु.ची कमाई होत असेल की नाही कोणास ठाऊक! या वयात त्या करत असलेल्या कष्टांचे कौतुक वाटले तसेच थोडे दु:खही वाटले. घरी कोण असते विचारावे वाटले, तुम्ही या वयात ही धडपड का करता विचारावे वाटले, कधीपासून हे काम करता विचारावे वाटले, दिवसाला किती पैसे सुटतात विचारावे वाटले. पण मी विचारले काहीच नाही. त्या प्रसन्न चेहऱ्यावर चुकुनही दु:खाची छटा नको दिसायला असे वाटले. जी काही परिस्थिती असेल त्यांची, त्यातही त्या आनंदी आहेत हे पाहून समाधान वाटले. ट्रेन आली, आम्ही दोघी चढलो आणि दोघीही दादरला उतरलो. त्या त्यांच्या मार्गे गेल्या, मी पुढे आले.
काही मिनिटांची आणि चार-पाच वाक्यांची ही भेट. पण आजीची ती हसतमुख मुद्रा अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून हटत नाहीये.

Friday, 3 June 2016

जून, मुंबई, पाऊस आणि मी...(भाग १)

जून महिना उजाडला की बऱ्याच जुन्या आठवणी डोके वर काढतात. मागच्या जून मध्ये या आठवणींची आठवण काढायला उसंतच नव्हती. मागच्या वर्षी मी मे ते जुलै गुजरातमध्ये होते तरीही दोन दिवस का असेना मुंबईला येणे झालेच आणि ते दोन दिवसही कधीच विसरले जाणार नाहीत असेच.. जूनच्या जुन्या आठवणींमध्ये तीही एक आठवण जमा झाली.


  • जून २०११
चुलतभावाला इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा होता. त्या प्रवेशफेरीचे निमित्त झाले आणि मी पहिल्यांदा मुंबईत दाखल झाले. सकाळी लवकर प्रवेश फेरीचे काम झाले की दिवसभर मग आम्ही मुंबईत कुठे कुठे फिरायचो. ४ दिवस दादर-वरळी-बांद्रा-महालक्ष्मी-छत्रपती शिवाजी टर्मिनस खूप ठिकाणी फिरलो. काका तेव्हा आमच्यासोबत असायचे. बेस्ट बसचा २५ रू. चा दैनिक मैजिक पास… दिवसभर मुंबईत कुठेही बस मध्ये बसा आणि कुठेही उतरा. काका इतकी वर्ष मुंबईत राहिलेले असल्यामुळे त्यांना सगळ्या बसेस, मार्ग माहित. कसलाही विचार न करता आम्ही दोघे त्यांच्या पाठी चालायचो, ते चढतील त्या बस मध्ये चढायचे, ते उतरतील तिथे उतरायचे.
वरळीचे नेहरू तारांगण मला पहायचे होते पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा शो सुरु व्हायला बराच अवकाश होता म्हणून मग तेथील सिक्युरिटी गार्ड ने आम्हाला सायन्स सेंटर पाहून यायला सुचवले. मधल्या शॉर्टकटने आम्ही नेहरू सायन्स सेंटरला पोहोचलो.  बाप रे! एवढी मोठी इमारत आणि कित्ती सारे ज्ञानामृत… एका दिवसात फक्त चालून सगळे पाहता येते. शिकायचे समजून घ्यायचे असेल तर आठवडाच काय, महिनाही अपुरा पडेल. चालून चालून आणि उभ्यानेच सगळे पाहून पाय थकले. मग आम्ही तिथेच बाहेर येउन, बागेत बसून काकींनी डब्यात दिलेली बटाट्याची भाजी अन चपाती खाल्ली. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा आत पाहायला गेलो. तेव्हा ठरवले होते की पुन्हा मुंबईला आल्यावर इथे यायचे नक्की. पण अजून ते राहिलेच आहे. पण आत्ता आठवले आहे तर आता लवकरच जाईन पुन्हा.…
४ दिवसात जमेल ती ठिकाणे पाहिली आणि गेले घरी माघारी.


  • जून २०१२
सुट्टीचा उपयोग करून घ्यायचा. कुठेतरी इंटर्नशिप करायची आणि त्यासोबत भरपूर फिरायचं, मजा करायची असं मी, चंचल आणि अपर्णाने ठरवलं. अभ्यासक्रमात ही इंटर्नशिप समाविष्ट नव्हती तरीही आम्ही ती करायची ठरवलं होतं. १५ दिवस मस्तपैकी अपर्णाच्या डोंबिवलीच्या घरी राहिलो. लोकलने डोंबिवली ते ठाणे प्रवास म्हणजे डेंजर!!! तुफान गर्दी…  बऱ्याचदा आम्हाला ट्रेन पकडताच यायची नाही गर्दीत. दोनवेळा तर असे झाले की एकजण एका ट्रेन मध्ये चढायची. दुसऱ्या दोघींना काय ते जमायचे नाही मग त्यामागून येणाऱ्या ट्रेन मध्ये कसेबसे चढायचो. पण खुशीखुशीने निवडलं होतं ते, झालो त्यातून पार. NDT (Non Destructive Testing)मध्ये ट्रेनिंग घेत होतो. आम्हाला मार्गदर्शन करणारी मुलगी मस्त chill असायची. सुरुवातीला बरंच काही वाचायला सांगायची. ते नीट कळत नव्हते तेव्हा आम्ही दुपारपर्यंत कंटाळून जायचो, आणि तिच्या ते लक्षात आले की ती आम्हाला जा म्हणून सांगायची, नाहीतर आम्हीच काहीतरी बहाणा सांगून सटकायचो. ऑफिसमध्ये असताना अनेकदा कोणाचे लक्ष नाही पाहून कंप्युटरवर गेम्स सुद्धा खेळलो. पण जेव्हा ती साईटवर घेऊन जायची तेव्हा छान वाटायचे. जे वाचतो, लिहतो ते प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय नीट समजत नाही. हळूहळू कळायला लागले वाचलेले आणि मग रिपोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट यायला लागला. 
ट्रेनिंगशिवाय या सुट्टीत बरेच काही केले. एकत्र स्वयंपाक करायला मजा यायची. मला अजूनही नेहमी आठवते. चंचल किंवा अपर्णा काहीतरी बनवत असतील तेव्हा मी ओट्यावर चढून बसायचे. किचनचा ओटा L आकाराचा होता, त्याच्या मोठ्या लांब बाजूला शेगडी होती आणि  छोट्या बाजूवर पाण्याची भांडी असायची. सरकवा-सरकवी करून मी तिथे बसायला थोडी जागा करायचे. आणि मग निवांत बसून मी खूपवेळ बडबड बडबड करत राहायचे. रात्री जेवल्यानंतर कितीही कंटाळा आला असला तरी, झोप येत असली तरी आम्ही पत्ते खेळल्याशिवाय झोपायचो नाही. सुट्टी होती ना ती मग खेळायला नको का?म्हणून फक्त! दरम्यान चंचलचा वाढदिवस आला. केक फुगे वगैरे आणून मस्त साजरा केला. एक दिवस घारापुरीची लेणी (एलिफंटा केव्ह्स) पाहायला गेलो. बोटीतला प्रवास, पाऊस, मक्याचे कणीस, फोटो,खरेदी… मस्त दिवस होता तो!  या सुट्टीतील काही फोटो एकत्र… 

  • जून २०१३
मुंबईतला मुसळधार पाऊस पाहिला तो या जूनमध्ये. फिल्ड ट्रेनिंगसाठी खऱ्या अर्थाने फिल्डवर दाखल झालो होतो. एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ट्रेनिंग घेत होतो. Raw material warehouse आणि finished goods warehouse चे बांधकाम चालू होते तळोजा MIDC मध्ये. इथे ट्रेनिंगला पुन्हा आम्ही त्याच तिघी. पण यावेळी एकत्र राहत नव्हतो. मी माझ्या काकांकडे मानखुर्दला, चंचल तिच्या मामांकडे कल्याणला आणि अपर्णा अर्थातच तिच्या स्वत:च्या घरी डोंबिवलीला (आमच्या शिवाय आणखी तिघीही होत्या, पण त्यांचे NDT मध्ये ट्रेनिंग चालू होते. त्या अपर्णाकडे राहिल्या).  तळोजाला जाण्यासाठी त्या दोघींना कल्याणहून थेट तळोजापर्यंत बस होती. मला मात्र मजल दरमजल करत यावे लागायचे. मानखुर्द ते खांदेश्वर लोकलने. खांदेश्वरला उतरल्यावर कळंबोली हायवेपर्यंत मी ३.५- ४ किमी. चालत जायचे. तिथे रिक्षा होत्या पण त्यांना रोज ७०-८० रु. देणे मला परवडणारे नव्हते. आणि तिथून शेअर रिक्षा नसायच्या. मग हायवेपासून MIDC पर्यंत six seater ने. आमची साईट शेवटच्या टोकाला होती. त्यामुळे त्या गाडीत बसलेला पहिला आणि उतरणारा शेवटचा प्रवासी मीच असायचे. साधारण ११ ते ५ असे ट्रेनिंग झाल्यावर आम्ही निघायचो तेव्हा मात्र मी चंचल आणि अपर्णासोबत कल्याणपर्यंत बसने आणि तिथून लोकलने मानखुर्द असे फिरून जायची. कारण पुन्हा ४ किमी चालण्याचे त्राण असले तरी अंधारात त्या रस्त्याने एकटी चालत जाण्यात धोका होता.
साईटवरील इंजिनिअर चांगले मार्गदर्शक होते, शिवाय ते आमच्याच कॉलेजमधील होते. प्रोजेक्ट व्यवस्थापकांनी सुद्धा खूप मदत केली. नवनवीन गोष्टी आम्हाला शिकवल्या. सर्वेईंग करताना फार मजा आली. फ्लोर लेवल फिक्स करायची होती. आणि आमच्या गाईडनी सेट केलेली ऑटो लेवल थोडी उंच होती. त्यातून पाहायला माझी उंची कमी असल्यामुळे पायाखाली विटा मांडून मला पाहावे लागायचे. साईटवर सुरक्षिततेसाठी आम्ही जेव्हा सेफ्टी शूज, हेल्मेट, जाकेट घालायचो तेव्हा उगाचच स्वत:चा अभिमान वाटायचा.

दरम्यान रविवारी सुट्टी म्हणून आम्ही सर्व मैत्रिणी चंचलच्या मामांकडे गेलो होतो. जेवणे आटोपली आणि बाकीच्या सर्वजणी अपर्णाच्या घरी गेल्या. मी चंचलच्या इथेच राहिले. दुसऱ्या दिवशी आम्ही साईटवर जाऊ आणि मग संध्याकाळी मी पुन्हा माझ्या काकांकडे… असे ठरले हते. पण त्यादिवशीच पाऊस जो सुरु झाला ते सलग ३ दिवस चालूच होता. आम्ही साईटवर ही गेलो नाही, घरातून बाहेरच पडलो नाही. तेव्हाच उत्तर भारतात ढगफुटी झाली होती. आणि दिवसभर त्याच्या बातम्या, मुलाखती टिव्हीवर चालू होत्या. चौथ्या दिवशी पावसाने रजा घेतली आणि मग आमचे काम पूर्ववत झाले. या पावसामुळे मात्र आम्हाला त्या सुट्टीत कुठेही फिरता आले नाही. पण तरीही हा अनुभव बरेच काही शिकवून गेला आणि आम्हाला समृद्ध करून गेला.

त्यानंतरचे अनुभव पुढच्या भागात… 

Wednesday, 1 June 2016

सामान्यांतले असामान्यत्व

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. जगावेगळ्या असणाऱ्या व्यक्तींच्या कार्यावर त्यामार्फत प्रकाश पाडला जात आहे. लेखक अरविंद जगताप यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे की ते अशा व्यक्तींचा शोध घेत आहेत. त्यामध्ये त्यांनी डॉ. हेमा साने आणि शांताबाई यादव या दोन अफलातून स्त्रियांची ओळख करून दिली. 
डॉ. साने यांनी आजवरच्या त्यांच्या आयुष्यात वीज वापरली नाही. ७५ वर्षे वीजेशिवाय त्या कशा राहू शकल्या असतील हा प्रश्न आजकाल मोबाईलशिवाय १० मिनिटे राहू न शकणाऱ्या मुलांना पडलाच पाहिजे. त्या जीवशास्त्र या विषयातील डॉक्टर आहेत आणि त्या विषयातील अनेक पुस्तकांचे  लेखनही त्यांनी केले आहे. वीजच नाही वापरत तर पंखा, टिव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, कुलर, मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींमागील पैशाचा आणि वेळेचा किती अपव्यय त्यांनी टाळला आहे, कल्पनाही करता येत नाही. आपल्या गरजा किमान असाव्या असे  मी खूपवेळा वाचले आहे, ऐकले आहे पण  हे प्रत्यक्षात जगणारी ही एकच व्यक्ती आजवर पाहिली.
दुसरी व्यक्ती म्हणजे शांताक्का, पतीच्या निधनानंतर चार मुलींची जबाबदारी एकटीवर पडलेली असताना जिद्दीने परिस्थितीला सामोरी गेलेली ही हिरकणीच. शेतीवाडी नाही, जमीनजुमला नाही मग करायचे काय असा प्रश्न असताना त्या रडत बसल्या नाहीत तर पतीचा दाढी-कटिंग चा व्यवसाय त्यांनी पुढे ३५ वर्षे चालू ठेवला. आजही त्या कोणापुढेही हात पसरत नाहीत, तोच व्यवसाय करून उपजीविका करतात. एका महिलेकडून खेडेगावात दाढी करून घेण्याचे पहिले पाऊल गावच्या सभापतींनी उचलले म्हणून बाकी लोकांनाही त्यात काही गैर नाही हे पटले असावे. याच व्यवसायाच्या मदतीने या माउलीने आपल्या चार मुलींच्या लग्नाचा खर्च पेलला.
Pg_1_2_1S
समाजात काही व्यक्ती थोड्या वेगळ्या असतात, काहीतरी चांगले करत असतात पण त्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही , किंबहुना प्रसिद्धीसाठी त्या काम करत नसतातच मुळी. काहीजण जगण्याचे तत्व म्हणून, काहीजण गरज म्हणून तर काही आपल्या आचरणातून जगाला चांगला संदेश द्यायचा म्हणून इतरांहून वेगळे आयुष्य जगत असतात. चाकोरीच्या बाहेर जाऊन वाटा धुंडाळत असतात. तसे पाहायला गेले तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण असते. आपल्या आजूबाजूलाही अशा व्यक्ती असतात पण त्यांचे मोठेपण सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. कारण एकतर त्यांचा तसे वागण्यामागचा विचार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नसू अथवा  डोळ्याला झापडे लावून बसत असू. किंवा अगदीच विचित्र किंवा विक्षिप्त माणूस असेही कधी कधी लेबल देत असू. या व्यक्ती फार मोठे काही काम करत नसतीलही, पण अनेक छोट्या गोष्टीं विशिष्ठ पद्धतीने करताना फार मोठे विचार त्यामागे असू शकतात. या लोकांचे वागणे, त्यांचे विचार आपल्याला समजून घेता आले पाहिजेत.
नाना पवार हे असेच एक व्यक्तिमत्व. कराडला कॉलेजला असताना अनेकदा प्रीतीसंगमावर जाणे व्हायचे. एकदा त्यांची भेट झाली. ते गेली कित्येक वर्षे दररोज पक्षी आणि माशांसाठी खाऊ घेऊन येतात. सुरुवात त्यांनी एकट्याने केली असली तरी आता अनेक हात त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. दुपारी उन्हे उतरायला लागल्यावर ते सायकलला पिशव्या अडकवून घरातून निघतात आणि दुकाने, हॉटेल, खाऊच्या गाड्यांवरून आणि घराघरांतून लोक देतील ते जमा करून कृष्णा- कोयनेच्या संगमावर येतात. कृष्णामाईची आरती करून, मासे आणि पक्ष्यांसाठी आणलेले अन्न किनाऱ्यावर आणि पाण्यात सोडून ते जातात. पक्ष्यांनाही याची एवढी सवय झालेली आहे की तिन्हीसांजेला संगमावर कोणत्याही निमंत्रणाशिवाय सगळे पक्षी जमा होतात.



खरेच किती सातत्याने त्यांचे हे व्रत अखंड चालू आहे, विशेष कौतुक वाटते मला या माणसांचे.

माझी आजी एकदा मला रागावली होती ते सहज आत्ता या निमित्ताने मला आठवले. मी तांदूळ की गहू काहीतरी निवडत होते आणि खडे काढून टाकताना त्यातील साळी(टरफल न निघालेले धान्य) फेकून देत होते. आजी मला रागावताना म्हणाली "अग जे तू कचऱ्यात टाकून देतेयस तेवढ्यावर लहान मोठ्या किमान २५ जीवांची भूक भागली असती", एका छोट्या प्रसंगातून तिने मला केवढी महत्वाची गोष्ट शिकवली होती ते आज लक्षात येते. तो बालमनावर केलेला संस्कार होता, तो रुजला. त्यामुळेच आजकाल जेव्हा होस्टेलमध्ये रोज मुलींनी ताटातून खरकटे टाकलेले अन्न  शेकडो किलोने वाया जाताना पाहते तेव्हा जीव तुटतो.
आदर्श ठेवण्यासाठी, धडे गिरवण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी प्रत्येक वेळी झाशीची राणी, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, डॉ. कलाम, इंदिरा गांधी किंवा अल्बर्ट आईनस्टाईन यांचीच चरित्रे वाचली पाहिजेत असे काही नाही. ही मोठी माणसे आपल्याला खूप काही शिकवून गेली आहेतच पण आपल्याच घरात आपली आई किंवा शेजारी राहणारे काका, शेवटच्या बाकावर बसलेला आपलाच मित्र हेही तितकंच मोलाचं काही आपल्याला सांगू पाहात असतात. आपल्याला ते डोळसपणे पाहता आले पाहिजे आणि नम्रपणे ऐकता आले पाहिजे. भल्या  माणसांच्या अशा छोट्या छोट्या कृतींमधून आपल्याला काही शिकता आले, प्रेरणा घेता आली तर आणखी काय हवे, नाही का?  

Saturday, 28 May 2016

मेळघाट : कल्पनेपलीकडील वास्तव

मेळघाट… सातपुडा पर्वत रांगांमध्ये दडलेला अमरावती जिल्ह्यातील एक मोठा प्रदेश… हिरवी गर्द वनराई आणि गिरीशिखरांमधून नागमोडी वळणे पार करून गेल्यावर दिसणारी छोटी छोटी गावं … कोरकू आदिवासींची इटुकली-पिटुकली घरं… 
हिरवा शालू नेसून साजशृंगार केलेल्या नववधूप्रमाणे सजलेली सृष्टी पाहावी तर मेळघाटातच… इथे डोळ्यांना शीतल सुखदता आणि मनाला गारवा देणारी हिरवळ चहूकडे पाहायला मिळते. शांत निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ रुळलो तर जणू निसर्गातील प्रत्येक अविष्कार आपल्याला साद घालतो. झाडांच्या पानांची सळसळ आणि झऱ्यांतून वाहणाऱ्या पाण्याची खळखळ ऐकताना जणू सतारीवरून अलगद बोटे फिरवल्यावर ऐकू येणाऱ्या नादमाधुर्याचा आभास होतो. पक्ष्यांचे कूजन कान तृप्त करतात आणि नकळत आपल्यालाही त्यांच्या वादसंवादात सामावून घेतात…

परंतू मेळघाटच्या या सृष्टीसौंदर्यात एक भीषण रखरखतं वास्तव लपलेलं आहे. सततचे बालमृत्यू आणि कुपोषण यांनी हा प्रदेश ग्रासलेला आहे. १९९७-९८ च्या पावसाळ्यात मेळघाटमध्ये होणारे बालमृत्यू आणि रोजच कानांवर येणाऱ्या बातम्या ऐकून पश्चिम महाराष्ट्रातील काही तरुण तिथे धावून गेले. आणि 'मैत्री धडक मोहिमे'अंतर्गत 'बालमृत्यू आणि कुपोषण' यासाठी झटणारे अनेक हात पुढे आले. गेली १८-१९ वर्षे दरवर्षी पावसाळ्यात ही मोहीम केली जाते आणि ज्या गावांत काम सुरु झालं तिथे कुपोषणाने होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण घटविण्यात मोठ्या प्रमाणावर यश आले आहे.
२०१२ च्या सप्टेंबर धडक मोहिमेसाठी जायचं असं मी ठरवलं आणि प्रवासाला निघाले. 
कराड ते मेळघाटमधील धारणी तालुक्यातील कासमार पर्यंतचा प्रवास अगदी सुखकर झाला पण खरे आव्हान तर त्यापुढे होते. दुसऱ्या दिवशी  काम सुरु करायचे म्हणून आमच्या ग्रुपमध्ये जे डॉक्टर होते त्यांनी आम्हाला लगेचच प्रशिक्षण दिले. औषधांची प्राथमिक ओळख, रोगांचा प्रादुर्भाव आणि त्याची लक्षणे एवढी पुरेशी माहिती अगदी सोप्प्या शब्दांत समजावून दिली. 
कासमारपासून साधारण ४ किमी अंतरावर असणाऱ्या 'सावऱ्या' गावात मला काम करायचे होते. ६ वर्षांखालील मुलांच्या घरी दररोज भेट देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करायची, योग्य ते औषधोपचार करायचे आणि गंभीर आजार असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जायचं असं ते काम… दिवसभरात १५ ते २० किमी पायपीट होत असली तरी चांगलं काम केल्याचं समाधान थकलेल्या चेहऱ्यावरही उठून दिसतं.
स्थानिक लोकांची कोरकू भाषा अवगत नसल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणं , जवळीक निर्माण करून आपल्याप्रती विश्वास संपादन करणं म्हणजे एक आव्हानच होतं. परंतू त्यांची बोलीभाषा शिकल्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार करणं, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं मोठं जिकिरीचं कामही तुलनेनं सोप्पं झालं.
आदिवासी लोकांचे प्रश्न सोडवायचे म्हणून एकेक प्रश्नाच्या मुळाशी जायचं तर वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्या तसे आणखी कित्येक प्रश्न एकामागोमाग एक येतात आणि मग आपण त्यात गुंतून जातो. ८-१० पाड्यांपलीकडे जग केवढे आहे याची त्यांना कल्पनाच नाही. शाळा पोचल्या तरी शिक्षण पोचले नाही ही या भागाची शोकांतिका आहे. आणि शिक्षण घेऊन नोकरी करायची तर गुलामांचं जिणं जगावं लागेल त्यामुळे शाळेत जायला माझ्या कोरकू बांधवांना मुळीच आवडत नाही. त्यामुळे शिक्षण कितीही भल्याचं असलं तरी त्याला त्यांचा स्पष्ट नकार आहे. त्यापेक्षा दिवसभर जंगलात भटकतील आणि आपल्याच शेतात राजासारखं राहतील.
माझ्या मेळघाट प्रवासात आणि मुक्कामात मला अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटल्या. आमच्यासाठी रोज रुचकर जेवण बनवणारी माई, तिची १०-१२ वर्षांची भाची मालती, मधुभाऊंसारखे मार्गदर्शक, निलेशसारखा सतत धडपडणारा मित्र आणि कुपोषणाने ग्रासलेला, आईशिवाय राहणारा एक वर्षाचा हसता- खेळता अभय या सर्वांनी त्यांच्याही नकळत मला खूप गोष्टी शिकवल्या.
आयुष्यभर पुरेल एवढी अनुभवांची शिदोरी आणि न मागता साथ देईल अशी मैत्री सोबत घेऊन मी परतले. 

या सगळ्या अनुभवांसोबत काही आनंदाचे, हास्याचे, गमतीजमतीचे, नाविन्याचे क्षण होते. त्यामुळे गंभीर समस्येवर काम करत असलो तरी वातावरण हलके फुलके राहायचे. त्यातील ही काही क्षणचित्रे…







खरोखर जगणं काय असतं आणि आपण काय जगतो याचा उहापोह करायचा असेल तर आयुष्यात एकदातरी मेळघाटला जाऊन आलंच पाहिजे असं मला वाटतं. शेवटी काय जगणं वसूल झालं पाहिजे.  

Thursday, 5 May 2016

गझल शिकताना...

सतत अस्वस्थ वाटत राहिले, तंद्री लागली किंवा नजर शून्यात… सवयीची कामे नकळत होऊन जातात पण नेमकी मनाची अवस्था उमजत नाही आणि अचानक काहीतरी सुंदर घडते. हाच तो क्षण…! निसटता निसटता चिमटीत पकडला जातो आणि हुरहूर कमी होते. रुणझुण शब्दांची चाहूल लागते.. आज असेच घडले.
गझल… या काव्यप्रकाराबद्दल मला  फार उत्सुकता होती. काहीतरी फार वेगळे असते पण नेमके काय ते माहित नव्हते. मग ऐकायला आणि वाचायला सुरुवात केली. जे गवसले ते फार सुंदर वाटले. आणि आज ही माझी पहिली गझल (कारण मला वाटले की ही कविता गझलेच्या आकृतीबंधात बसू शकते) कागदावर अवतरली. ही व्याकरणाच्या दृष्टीने किती बरोबर आणि किती चूकलीये ते काही माहित नव्हतं, पण काहीतरी नवीन सुचल्याचा आणि सापडल्याचा आनंद खूप झाला.  काहीतरी मोडके तोडके लिहिले आणि मित्र मैत्रिणींना वाचायला दिले. त्या ओळी अशा… 

सुख गोजिरे, स्वप्न साजरे कुणासाठी… 
अनामिक ही ओढ चिरंतन कुणासाठी… 
शब्द-सुरांच्या मैफिलीत परका आज मी
गीत हे प्रेमाचे रचतो  कुणासाठी ?
घरट्याचे स्वप्न मोडले रचण्याआधी
काडी काडी जमवे मन कुणासाठी?
दूरवरून दिसे तो डोह शांत नितळ 
आतल्या आत खोल ढवळे कुणासाठी?
निश्चयाचा बांध मना अन कठोर तटबंदी
निर्झर अनवट वाहतो कुणासाठी? 
तोडला धागा स्वत:च मी नात्याचा
मग आज मन अस्वस्थ कुणासाठी?
निरोप दिला तुज हास्यमुखाने
वळणावरी त्याच मी थांबलो कुणासाठी?

काही वेळाने लक्षात आले की आपल्या ओळखीची एक ताई आहे, तीची एक गझल वृत्तपत्रात वाचली होती.  मग तिला ही रचना वाचावयास दिली आणि गझलेच्या आकृतीबंधात बसते का विचारलं. तिने खूप छान समजावले. या रचनेला गझल म्हणता येणार नाही.  गझलेत ऱ्हस्व दीर्घ अक्षरांचा एक विशिष्ट क्रम सांभाळायचा असतो. आणि पहिल्या ओळीतील क्रम नंतरच्या प्रत्येक ओळीत आला पाहिजे. आणखी बरेच नियम असतात म्हणाली ती; पण आधी स्वरांची लय समजून घे असे तिने सांगितले. आणि शिकण्यासाठी, समजण्यासाठी  काही गझलकारांच्या गझला वाचायावयास सुचवले. 
अभ्यासाची सुरुवात आहे फक्त ही… मुळाक्षरे गिरवता यायला लागल्यावर बाराखडी, शब्द , वाक्य  आणि मग पुढचा धडा… शिकायला भरपूर आहे या जगात. एका भाषेचे एवढे कंगोरे… हा जन्म नाही पुरायचा पण सुरुवात तर झाली, हेही नसे थोडके!

Monday, 18 April 2016

जलसा

हातात कोणीतरी दिलेला लाडू चिवडा.. थोडी जीर्ण झालेली, थोडी कसली! बरीच जीर्ण झालेली एक हिरवी नऊवार.. डोक्यावरून पदर, कपाळी भला मोठा कुंकवाचा टीळा, एका पायात निळी-पांढरी थोडी अपुरी चप्पल तर दुसऱ्या पायात लाल चप्पल, अंगठ्याच्या पुढे आणि टाचेच्या मागे इंच-इंच जागा उरेल अशी एक! अनुभवाने आलेले शहाणपण डोळ्यांत दिसत होते..
काटक अन सडपातळ देहयष्टी, चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून तर्क केला, सहज पन्नासेक वर्षाचा संसार झाला असेल या आजीचा.. हरीसप्ताहात विठूरायाची भजने, अभंग गायला ती आली नाही तर गावालाच चुकल्यासारखे वाटेल. गोड गळा आणि मुखात हरीनाम..ही जलसा आजी साऱ्या गावाची..आणि ती स्वत:साठी मात्र तिच्या बाप्पुरावची! उठता बसता बाप्पुरावचे नाव ओठी.. आणि नाव घेतले की एक खळखळून हास्य! कोणालाही तिचा हेवा वाटावा असे. गावातील कोणत्याही लग्नकार्यात, मंगलप्रसंगी उखाणा घ्यायचा म्हटलं तर जलसाआजी सर्वात पुढे.. प्रसंग कोणताही असो, शब्दांची गुंफण क्षणार्धात.. चहा पिताना बाप्पुराव, चिवडा खाताना बाप्पुराव,
“एकदा केला निवून गेला, चिवडा करीन ताजा,
बाप्पुरावचं नाव घ्याया पहिला नंबर माझा”
महादेवाच्या पिंडीवर बेल वाहताना बाप्पुराव, नवी नवरी पाहिली त्यावरून उखाणा त्यातही तिचा बाप्पुराव, कांदे लसणाच्या पिशव्या भरताना दिसले तर त्यावरून हा
“भरले कांदे, भरला लसूण, पिशव्या झाल्या दोन,
बाप्पुरावचं नाव घेते, पोहोचल्यावर करा फोन”
वटसावित्रीच्या पूजेपासून बेंदूर, पंचमी, गौरी गणपती, दसरा-दिवाळी, संक्रांत, गुढीपाडवा करत आषाढी एकादशीपर्यंत वर्षाच्या साऱ्या सणांना एका उखाण्यात बाप्पुरावच्या नावासाठी, माळेचे मणी ओवल्याप्रमाणे सुंदर ओवणारी ही साऱ्या गावाची जलसा...आणि एक कटू सत्य!
बाप्पुरावनं हिला कधी नांदवलीच नाही, दुसरे लग्न करून संसार थाटला!
आणि हीचं सारं आयुष्य त्याचं उखाण्यात नाव घेण्यात..
माहेरी कोणीतरी दिलेल्या भाकरतुकड्यावर जगून शेळ्या-मेंढ्यापाठी रानावनात!


-    मेघा निकम 

Wednesday, 9 March 2016

सांजवेळ

संध्याकाळ… 
कोणाला खुणावणारी, कोणाला हसवणारी…
कोणाच्या डोळ्यात पाणी आणणारी, काहीशी हुरहूर लावून जाणारी ….
मला मात्र या मावळत्या दिनकराच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पाडणारी… अशी ही संध्याकाळ… 


थोडावेळ सूर्यास्ताकडे पाहून मी माघारी फिरले आणि तेवढ्यात माझ्या  लक्षात आले, आणखी दोन क्षण न पाहते तर किती सुंदर दृश्य पाहण्यास मुकले असते कोण जाणे!!!



घरट्याच्या दिशेने जाणारा हा पाखरांचा थवा थोडा रेंगाळला… सूर्याला जणू प्रदक्षिणा घालत आहेत असा भास झाला...  कॅमेऱ्याची सोबत आहेच आणि आता तर शब्दांनीही सोबत केली हे क्षण साठवून ठेवायला..आणि नकळत मी पुटपुटले ... 
"अशाच एका सांजवेळी
नभी सोन्याचे कोंदण
सोन्याच्या गोळ्याला अन 
पाखरांची ती माळ मनोरम"

आजकाल अनेक कवितांच्या प्रेमात पडले आहे. स्पृहा जोशी, शांता शेळके यांच्या कविता, चंद्रशेखर गोखले यांच्या चारोळ्या वाचायला मिळत आहेत याचा आनंद आहेच, शिवाय माझ्या शब्दकोशात मोलाची भर पडते आहे आणि असे काहीसे सुचते आहे...आणि आजच जीएंची पत्रवेळा हाती पडली… ते म्हणतात "खरं सांगायचं तर, मला काव्याची देणगी नाही, पण मिजास मात्र आहे!" व्वाह! 

Sunday, 6 March 2016

फ्लेमिंगो फेस्टीवल


आज फ्लेमिंगो पक्षी पाहायला गेले होते. शिवडी जेट्टीजवळ हजारोंच्या संख्येने हे पाहायला मिळतात. मराठीमध्ये त्यांना रोहित पक्षी म्हटलं जातं. पण बहुतांश लोक फ्लेमिंगो या नावानेच ओळखतात. सौराष्ट्रातून स्थलांतर करून येतात ते हिवाळ्यात मुंबईला..मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मी पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिले फ्लेमिंगो.. सकाळची वेळ होती आणि खूप धुकं असल्यामुळे आधी नजरेस पडलेच नाहीत. आणि जेव्हा दिसले तेव्हा खूप दूर गेले होते ते.. इकडून तिकडे उडून जाताना जेवढे दृष्टीस पडले तेवढंच डोळ्यांना सुख लाभलं.. हळूहळू सूर्य माथ्याला आला आणि मी परतीचा रस्ता धरला.
यावर्षी मात्र योग्य वेळेला मी त्याठिकाणी पोहोचले. समुद्राच्या भरती- ओहोटीनुसार फ्लेमिंगो किनाऱ्याच्या जवळ किंवा दूर जात असतात. भरतीची वेळ संध्याकाळची होती आणि मी दुपारीच तिथे जाऊन बसले. आधी ते सर्व दूर होते. माझ्या नजरेच्या टप्प्यातही नव्हते आणि कॅमेऱ्याची लेन्ससुद्धा मला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याएवढी सक्षम नव्हती. हळूहळू पाणी किनाऱ्याकडे सरकू लागले आणि त्याचबरोबर फ्लेमिंगोही.. एरवी काही वाटत नाही. पण पक्षी पाहायला गेलो की दुर्बिणीची उणीव भासते. इतर लोकांकडे, पक्षीनिरीक्षक- अभ्यासकांकडे असते. मग त्यांचं पाहून झालं की त्यांना विनंती करून पाच मिनिटासाठी त्यांची दुर्बीण मागून घ्यायची. त्यातून दिसलं की आनंदी व्हायचं. ते सांगतील ती माहिती कानात आणि डोक्यात साठवून ठेवायची. पक्ष्यांचे आवाज ऐकायचे, हालचाली, चालणं, उडणं पाहायचं..त्यांचे प्रकार, राहणीमान, खाद्य समजून घ्यायचं.. मजा वाटते खूप.. चार पाच तास कसे गेले कळलेच नाही. सहा वाजेपर्यंत ते अगदी किनाऱ्यालगत आले. खूप जवळून पाहता आले. मनासारखे फोटो काढता आले. छान छान फोटो काढल्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटावीशी वाटली.














आज तिथं गेले तेव्हा खूप गर्दी होती माणसांची.. आपल्यासारखीच आवड असणारे शेकडो लोक पाहून आनंद झाला. अगदी लहान लहान मुले कोणी आई- बाबांसोबत, कोणी शिक्षकांसोबत आलेली.. कुतूहलाने पाहत होती. अनेक प्रश्न विचारात होती. थोड्या वेळासाठी वाटलं लहानपणी असे शिक्षक मिळायला पाहिजे होते आपल्याला.. पक्षी प्राण्यांची माहिती थेट निसर्गात घेऊन जाऊन दाखवणारे, शिकवणारे..किंवा आईबाबांना एवढा वेळ, अशी आवड असायला पाहिजे होती.. पण नंतर तिथे आलेल्या काही वृध्द व्यक्तींकडे पाहिले. तेही आज प्रथमच हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवत होते. मग स्वत:ला समजावलं की आपण त्यांच्या तुलनेने तर खूप लवकर हा आनंद घेतोय. It’s never too late. आता फार उशीर झालाय असं म्हणून आत्ता केलं नाही तर आणखीच उशीर होणार. अगदी एखादी चांगली सवय असेल, चांगलं पुस्तक असेल, नवीन कला शिकायची असेल, नवीन छंद जोपासायचा असेल. मनात आलं की सुरु केला पाहिजे. उशीर झालाय, आता मी करू शकणार नाही असं म्हणून आपलं मन आपणच मोडता कामा नये. एक लक्षात आलं की ज्या उत्साहाने ती लहान मुले हे पक्षी पाहत होती तेवढ्याच किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्त उत्साह आणि कुतूहलाने ते आजी आजोबा सर्व निरखत होते. हे सुंदर दृश्य डोळ्यात साठवत होते. कदाचित आयुष्यभराच्या कमाईतून दमडी दमडी साठवून ठेवलेल्या आणि नुकताच नवीन खरेदी केलेल्या कॅमेरामध्ये हे क्षण टिपण्याचा आनंद घेत होते. आणि या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून कुठेतरी आत मलाही समाधान मिळत होते.

Friday, 4 March 2016

तुझ्यावरच्या कविता

कविता कशा सुचतात गं तुला?
तू विचारल्यावर काय सांगू कळत नाही
तुझ्यावरच्या कविता लिहायला
तुझ्या आठवणींतून वेळ मिळत नाही
हल्ली दुसऱ्यांच्याच कविता वाचते फक्त
कवितेचा अर्थ मात्र आकळत नाही
त्यात शोधत राहते तुला आणि मला
माझे असे काही मला मिळत नाही
प्रेरणा कोण माझ्या कवितेची?
तूच आहेस ते तुला मात्र कळत नाही

-    मेघा

पावसाच्या सरी



अवचित आज आल्या पावसाच्या सरी..
एक अनामिक हुरहुर लागे अंतरी..
गोठ्यातून माझिया ती कामधेनू हंबरी..
साद घालावी लेकरा या रे लवकर घरी..

Tuesday, 9 February 2016

ती आणि तो

जुनी रद्दी तपासत होते त्यात एका कागदावर मीच केव्हातरी लिहलेली कविता सापडली. अशा माझ्या काही कविता खरंच रद्दीत गेल्या. त्या फार सुंदर नसतीलही कदाचित पण त्या त्या वेळच्या "माझी"च आठवण मला करून देणाऱ्या ठरल्या असत्या. आता कागद कुठेही गेले तरी काळजी नसावी म्हणून हा ब्लॉग वर जपून ठेवण्याचा अट्टाहास.  चार वर्षापूर्वी लिहली असेल मी ही कविता. अगदी सोप्प्या शब्दांत सहज मांडलेली रचना…
प्रत्येक मुलगी आपल्या घरात अगदी लाडात वाढलेली असते आणि तिच्या "बाबा"रुपी हिरो ने तिला भरभरून प्रेम दिलेलं असतं. ती कितीही "मी लग्न करणारच नाही" असे म्हणत असली तरी तिची तिच्या भविष्याबद्दल आणि जोडीदाराबद्दल काही स्वप्ने असतात. ही स्वप्ने कितपत खरी होतात, हे ती स्वप्ने रंगवणारी आणि जगणारीच जाणो!

तिच्या आयुष्यात एक तो असतो
जीवन सुंदर करणारा….
चांदण्याच्या प्रकाशात
हातात हात घेऊन चालणारा
तिच्या सौंदर्याचं अगदी
मनापासून कौतुक करणारा
तिचे अश्रू हातात घेऊन
ओंजळभर फुले देणारा…

तिच्या आयुष्यात एक तो असतो
जीवन सुंदर करणारा…
तिच्यासमोर तिच्यासारखाच
लटकं लटकं रागावणारा
तिच्या मनातल्या गोष्टी
पाहताक्षणी समजून घेणारा
स्वत:च्या मनातल्या गोष्टी
पहिल्यांदा तिलाच सांगणारा

तिच्या आयुष्यात एक तो असतो
जीवन सुंदर करणारा….
डगमगली कधी जर ती
आधाराचा हात देणारा
थकली श्रमाच्या ओझ्याने तर
पाठीवरून हात फिरवणारा
तिचे चुकते पाऊल फिरवणारा
जाणारा तोल सावरणारा

तिच्या आयुष्यात एक तो असतो
जीवन सुंदर करणारा….
तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी
रात्रंदिवस धडपडणारा
स्वत:च्या स्वप्नातदेखील
तिला सोबत घेऊन जगणारा
तिच्या आयुष्यात असा "तो" खरंच असतो
की फक्त स्वप्नात भेटून जाणारा??

 What a saying! Quote for today and lifetime!

"Many of us don’t have options in life so we live the way others want us to. But some of us who have, should live life differently and if required change the course of life."