Monday, 26 February 2018

आयुष्याच्या संध्याकाळी

ते आधी खूप रमतात
भरपूर मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांमधे
ओळखीच्या माणसांमध्ये
गप्पा गोष्टी सुख असतं...
आपुलकी असते, विचारपूस असते..
सूख असतं तोवर सगळेच आपले!
आणि मग चोरपावलाने दु:ख येतं
हळूच मागच्या दाराने...
आता तीच "आपली" माणसे
चौकशी करू लागतात!
भेटलो असतो पण आता जरा
"व्यस्त आहे हो" म्हणतात..
आपल्या अपयशाची चवीने चर्चा
मात्र आपल्यापाठी करत असतात!
उबग येतो त्यांना सर्वांचाच
दूरदेशी निघून जातात ती!
तिकडे सगळे अनोळखी
त्यांच्या भूतकाळाबद्दल अनभिज्ञ..
स्वत:ची नवी ओळख जपत
सावरतात अन् विसरतात सारे दु:ख..
मन तिकडेही रमतेच की
स्वच्छंद विहार ,मोकळा श्वास!
वर्षे उलटून जातात मनमुराद जगताना
अन् स्वत:ला 'पदोपदी' सिद्ध करताना..
दमछाक होते आता रोज
दुनियेला ओळख पटवून देताना!
'ओढ' जाणवते आपल्या मातीची
अन् त्या मातीत खेळलेल्या सवंगड्यांची..
आपली माणसे ती आपलीच
आणि "तीच" असतात आपली!
परतायची वेळ होते तेव्हा
आकाश असतं निरभ्र...
अन आता सर्वांचेच
डोईवरील केस शुभ्र...!
हेवेदावे, मत्सर आता कुणी करत नाही...
(आयुष्याच्या)संध्याकाळी पार्कातले हितगुज चुकत नाही...
कारण तोवर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं...
जगायचं जगायचं म्हणताना खरं जगणंच राहून गेलेलं असतं...
- मेघा निकम