Tuesday, 14 June 2016

प्रेषित

भूतकाळात अडकून न पडता वर्तमानात जगायचे आणि भविष्याची आखणी करायची असं मनाला  कितीही समजावलं तरी वर्तमानात काही गोष्टी अशा घडतात, अशा पद्धतीने समोर येतात की आपण नकळत भूतकाळात डोकावतो. असेच काहीसे झाले आज…
"प्रेषित", १९८३ साली प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी लिहलेली ही विज्ञानकादंबरी. 
"पृथ्वीप्रमाणेच दुसऱ्या कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी असेल का याचा गुप्तपणे शोध घेत असताना एका शास्त्रज्ञाच्या हाती लागलेली माहिती, त्याचा अपघाती मृत्यू, आणि त्याने त्या परग्रहावर पाठवलेल्या संदेशातून पुढे चाळीस वर्षांनंतर घडलेल्या घटना" नाट्यमय पद्धतीने रंगवल्या आहेत. वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहेच शिवाय १९८३ सालात कल्पना केलेल्या भविष्यात होऊ शकतील अशा कितीतरी गोष्टी आज २०१६ मध्ये खऱ्या वाटतात. मला खरोखर ही कादंबरी यासाठी आवडली की सामान्य माणसाला समजेल अशा रीतीने प्रसंगांची, वैज्ञानिक संकल्पनांची मांडणी केली आहे. ही कादंबरी वाचून पूर्ण झाली आणि मला आठवले… 

मी नववीत होते तेव्हा एका परीक्षेमार्फत जिल्ह्यातून शंभरेक मुलांची निवड "विज्ञानमंच" या आठ दिवसांच्या कार्यशाळेसाठी झाली होती. सातारा जिल्ह्यातील त्या मुलांमध्ये मीही एक होते. माझ्यासह एकूण पन्नास मुलामुलींसाठी हे निवासी शिबीर होते. बाकीचे साताऱ्याच्या जवळपासचे (सातारा तालुक्यातील) असल्याने ते त्यांच्या घरूनच ये जा करत. त्यावेळी यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज मध्ये ही कार्यशाळा चालू होती. आणि बी. एस्सी, एम एस्सी चे प्राध्यापक आम्हाला वेगवेगळे विषय शिकवत आणि प्रयोगाची प्रात्यक्षिकेही देत होते. या कार्यशाळेत आम्हाला विज्ञान शाखेतील अनेक विषयांची तज्ञांकडून ओळख करून दिली गेली. अनेक वैज्ञानिक प्रयोग स्वत: करायला मिळाले. तिथे मार्गदर्शन वर्ग चालू असताना आम्हाला बसल्या जागी चहा बिस्कीट मिळत असे याचे कोण कौतुक वाटायचे! एवढी Special treatment त्याआधी कुठेच मिळाली नव्हती. त्या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी उद्घाटनाच्या भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य आम्हाला उद्देशून म्हणाले होते "you are the cream of society" आजही ते शब्द आठवले की अंगावर मुठभर मास चढल्यासारखे वाटते.

सांगायचा मुद्दा हा होता की त्या कार्यशाळेतून एक दिवस आयोजक आम्हाला डॉ. जयंत नारळीकरांचे व्याख्यान ऐकायला घेऊन गेले. ते खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत हे आधीच सांगितले होते. त्यामुळे आम्ही चूपचाप जाऊन व्याख्यान ऐकत बसलो. त्यावेळी त्यांनी काय सांगितले ते आता फारसे लक्षात नाही (किंबहुना आठवत नाहीच). पण एका विज्ञानकादंबरीचे नाव "कृष्णमेघ" (The Black cloud) लक्षात राहिले आणि त्यांनी दिलेला पत्ता "आयुका, पुणे-७" असा वहीत लिहून ठेवलेला. ती वही रद्दीत गेली पण पत्ता लक्षात राहिला. पुढे मी अनेकवेळा फलटणला पुस्तक प्रदर्शन भरले की त्यात ते "कृष्णमेघ" मिळते का शोधत राहायचे. अनेक पुस्तके वाचली पण हे काही मिळाले नाही. मी हळूहळू ते विसरून गेले. मग मागच्या वर्षी मी जेव्हा इंटरनेट वापरून पुस्तकांची ऑनलाइन खरेदी करायला लागले तेव्हा या पुस्तकाची आठवण झाली. मी पुन्हा शोध सुरु केला पण माझ्या लक्षात राहिलेली गोष्ट अर्धीच खरी होती. मला त्या कादंबरीचे लेखक डॉ. नारळीकर आहेत असे वाटायचे. मला ती कादंबरी काही केल्या मिळत नव्हती. मग मी असेच एकदा दादरच्या पुस्तकांच्या दुकानात गेले तिथे मला डॉ. नारळीकरांचे विज्ञानकथांचा संग्रह असलेले "यक्षांची देणगी" पुस्तक दिसले. मी ते खरेदी केले आणि त्याची प्रस्तावना वाचताना मला हे समजले की The black cloud ही फ्रेड हॉयल यांनी लिहलेली कादंबरी आहे आणि ते डॉ. नारळीकर यांचे डॉक्टरेटचे मार्गदर्शक होते. आता मला ती कादंबरी नक्कीच मिळेल. आज 'प्रेषित' वाचली, आणि ती आवडली. आता "कृष्णमेघ"ही आवर्जून वाचेन. 

Friday, 10 June 2016

एक छोटीशीच भेट...

आज पहाटे डेहराडून एक्स्प्रेसमधून बोरीवली स्टेशनला उतरले. ३:५० ची चर्चगेट लोकल उभीच होती. पाठीवरील मोठे ओझे पाहून मागे लागलेल्या रिक्षावाल्यांना चुकवून लोकलचे तिकीट काढून मी महिलांच्या डब्यात चढले. डब्यात तीन बायका, सुरक्षा पोलीस आणि मी एवढीच माणसे. त्यातील एक 'म्हातारी बाई' आधीच झोपलेली होती. दुसऱ्या दोघी कुठूनतरी लांबून प्रवास करून आलेल्या आणि आता अंधेरीला उतरणार होत्या.
मला हे माहित झाले कारण त्या दोघींपैकी एक साधारण ६०-६५ वर्षांची असेल माझ्याकडे येऊन विचारत होती की "ही ट्रेन अंधेरीला जाईल ना?"
  मी 'हो' म्हटले तरी ती माझ्यासमोरच बसून राहिली.
काहीतरी बोलायचे म्हणून मी विचारले, "एकट्याच कुठे गेला होता?"
त्यांना बहुतेक ऐकू कमी येत असावे. त्यांचे असंदिग्ध उत्तर ऐकून मी पुन्हा दोनदा विचारले. शेवटी त्या म्हणाल्या "एकटी नाही, आईला घेऊन चालले." एवढे बोलून ती उठली आणि तिच्या आईजवळ गेली.
 मी क्षणभर विचारत पडले. ज्या बाईला स्वत:लाच आता प्रवासात तिच्या मुलांनी किंवा कोणीतरी सोबत करायची गरज आहे, ती आईला सांभाळत आहे. तिची आई अतिशय वृद्ध आणि कृश दिसत होती.

मी पुन्हा काही क्षण डब्यात नजर फिरवली. झोपलेल्या 'त्या' म्हातारीकडे पाहिले. ती शेवटच्या स्टेशनवर उतरणार असेल असा अंदाज बांधला. ट्रेन निघायला आणि मग दादरला पोहचायला वेळ लागणार होता. पहाटेच्या शांततेत रेल्वेच्या सूचनांचा आवाज जरा जास्तच मोठा वाटत होता. मग मीही रिकाम्या बाकावर आडवी झाले. दिल्लीपासून ३० तास सलग केलेल्या प्रवासाने थोडा थकवा आलेला होताच आणि पहाटे साडेतीनला उतरायचे असल्यामुळे आणि सोबत कुणीही नसल्याने अर्थातच रात्रभर नीट झोपू शकले नव्हते. ट्रेन निघाली, मी आडवी होऊनही सावध झोपले होते. पुढील स्टेशन कांदिवली, मालाड, गोरेगाव अशा सूचना कानावर पडतच होत्या. अंधेरी स्टेशन आले तेव्हा एकदा उठून बसले. त्या दोन आज्जी त्यांच्या पिशव्या घेऊन उतरल्या. ते पाहिले आणि मी पुन्हा आडवी झाले. डोळा केव्हा आणि कसा लागला ते अजूनही आठवत नाहीये. पण "पुढील स्टेशन एल्फिन्स्टन रोड' कानावर आदळले आणि मी खाडकन जागी झाले. 'छे! आधीच वैतागले आहे आणि पुन्हा दादरसाठी दुसरी ट्रेन पकडून मागे जावे लागणार.' पटकन सामान उचलले आणि उतरले. तेव्हा माझ्यासोबत ती झोपलेली आज्जीही उतरली होती. 'मी चुकून जरी या स्टेशनवर आले असले तरी माघारी जाण्यासाठी एक तिकीट घ्यावे लागणार' हा विचार चारदा आला पण कंटाळा, आळस आणि बेपर्वाई या गोष्टींनी त्यावर मात केली. माझ्यासारखेच असे किती विनातिकीट प्रवास झाले असतील ज्याची कुठेच नोंद नाही. तिकीट न घेताच मी उलट दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत एका बाकावर बसले.

तेवढ्यात गोड आवाजात आणि मिश्किल हसत ती आज्जी म्हणाली, "मला दादरला उतरायचे होते पण जागच आली नाही."

मी तिच्याकडे पाहिले, ती स्मितहास्य करत होती, मीही हसले, म्हटलं "अहो, मलाही तिथेच उतरायचे होते."
दोघी एकमेकींकडे पाहून हसलो. त्यांच्या हातातल्या पिशवीकडे मी नकळत पाहत होते.
मी काही विचारण्याआधी त्या स्वत:च म्हणाल्या "भाजी घेऊन जायचंय."
पिशवीचा आकार लक्षात घेऊन मी म्हटलं "विकण्यासाठी का?"
त्यांनी होकारार्थी मान डोलावली. मी पुढे विचारलं "कुठे विकता?"
म्हणाल्या "दादरला घेते आणि बोरिवलीला नेऊन विकते."
मी पाहत राहिले. ६०-७० वर्षाची बाई. चेहऱ्यावरील सुरकुत्याच तेवढे वय दर्शवत होत्या. गळाबंद आणि कोपरापर्यंत लांब बाह्या असलेला ब्लाउज, साडीसारखे काहीतरी (पण साडी नक्कीच नाही) कापड अंगभर गुंडाळलेले, मान मागे पुढे डुलते आहे. साधारण साडेचार फूट उंची, पाठीला थोडासा बाक, आवाज अतिशय गोड आणि चेहऱ्यावर सुंदर हास्य, प्रसन्न आणि तेजस्वी मुद्रा.  पहाटे चारच्या ट्रेनने प्रवास करून रोज भाजी विकते. दिवसाला ७०-८०रु.ची कमाई होत असेल की नाही कोणास ठाऊक! या वयात त्या करत असलेल्या कष्टांचे कौतुक वाटले तसेच थोडे दु:खही वाटले. घरी कोण असते विचारावे वाटले, तुम्ही या वयात ही धडपड का करता विचारावे वाटले, कधीपासून हे काम करता विचारावे वाटले, दिवसाला किती पैसे सुटतात विचारावे वाटले. पण मी विचारले काहीच नाही. त्या प्रसन्न चेहऱ्यावर चुकुनही दु:खाची छटा नको दिसायला असे वाटले. जी काही परिस्थिती असेल त्यांची, त्यातही त्या आनंदी आहेत हे पाहून समाधान वाटले. ट्रेन आली, आम्ही दोघी चढलो आणि दोघीही दादरला उतरलो. त्या त्यांच्या मार्गे गेल्या, मी पुढे आले.
काही मिनिटांची आणि चार-पाच वाक्यांची ही भेट. पण आजीची ती हसतमुख मुद्रा अजूनही माझ्या डोळ्यांसमोरून हटत नाहीये.

Friday, 3 June 2016

जून, मुंबई, पाऊस आणि मी...(भाग १)

जून महिना उजाडला की बऱ्याच जुन्या आठवणी डोके वर काढतात. मागच्या जून मध्ये या आठवणींची आठवण काढायला उसंतच नव्हती. मागच्या वर्षी मी मे ते जुलै गुजरातमध्ये होते तरीही दोन दिवस का असेना मुंबईला येणे झालेच आणि ते दोन दिवसही कधीच विसरले जाणार नाहीत असेच.. जूनच्या जुन्या आठवणींमध्ये तीही एक आठवण जमा झाली.


  • जून २०११
चुलतभावाला इंजिनिअरिंग डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा होता. त्या प्रवेशफेरीचे निमित्त झाले आणि मी पहिल्यांदा मुंबईत दाखल झाले. सकाळी लवकर प्रवेश फेरीचे काम झाले की दिवसभर मग आम्ही मुंबईत कुठे कुठे फिरायचो. ४ दिवस दादर-वरळी-बांद्रा-महालक्ष्मी-छत्रपती शिवाजी टर्मिनस खूप ठिकाणी फिरलो. काका तेव्हा आमच्यासोबत असायचे. बेस्ट बसचा २५ रू. चा दैनिक मैजिक पास… दिवसभर मुंबईत कुठेही बस मध्ये बसा आणि कुठेही उतरा. काका इतकी वर्ष मुंबईत राहिलेले असल्यामुळे त्यांना सगळ्या बसेस, मार्ग माहित. कसलाही विचार न करता आम्ही दोघे त्यांच्या पाठी चालायचो, ते चढतील त्या बस मध्ये चढायचे, ते उतरतील तिथे उतरायचे.
वरळीचे नेहरू तारांगण मला पहायचे होते पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा शो सुरु व्हायला बराच अवकाश होता म्हणून मग तेथील सिक्युरिटी गार्ड ने आम्हाला सायन्स सेंटर पाहून यायला सुचवले. मधल्या शॉर्टकटने आम्ही नेहरू सायन्स सेंटरला पोहोचलो.  बाप रे! एवढी मोठी इमारत आणि कित्ती सारे ज्ञानामृत… एका दिवसात फक्त चालून सगळे पाहता येते. शिकायचे समजून घ्यायचे असेल तर आठवडाच काय, महिनाही अपुरा पडेल. चालून चालून आणि उभ्यानेच सगळे पाहून पाय थकले. मग आम्ही तिथेच बाहेर येउन, बागेत बसून काकींनी डब्यात दिलेली बटाट्याची भाजी अन चपाती खाल्ली. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा आत पाहायला गेलो. तेव्हा ठरवले होते की पुन्हा मुंबईला आल्यावर इथे यायचे नक्की. पण अजून ते राहिलेच आहे. पण आत्ता आठवले आहे तर आता लवकरच जाईन पुन्हा.…
४ दिवसात जमेल ती ठिकाणे पाहिली आणि गेले घरी माघारी.


  • जून २०१२
सुट्टीचा उपयोग करून घ्यायचा. कुठेतरी इंटर्नशिप करायची आणि त्यासोबत भरपूर फिरायचं, मजा करायची असं मी, चंचल आणि अपर्णाने ठरवलं. अभ्यासक्रमात ही इंटर्नशिप समाविष्ट नव्हती तरीही आम्ही ती करायची ठरवलं होतं. १५ दिवस मस्तपैकी अपर्णाच्या डोंबिवलीच्या घरी राहिलो. लोकलने डोंबिवली ते ठाणे प्रवास म्हणजे डेंजर!!! तुफान गर्दी…  बऱ्याचदा आम्हाला ट्रेन पकडताच यायची नाही गर्दीत. दोनवेळा तर असे झाले की एकजण एका ट्रेन मध्ये चढायची. दुसऱ्या दोघींना काय ते जमायचे नाही मग त्यामागून येणाऱ्या ट्रेन मध्ये कसेबसे चढायचो. पण खुशीखुशीने निवडलं होतं ते, झालो त्यातून पार. NDT (Non Destructive Testing)मध्ये ट्रेनिंग घेत होतो. आम्हाला मार्गदर्शन करणारी मुलगी मस्त chill असायची. सुरुवातीला बरंच काही वाचायला सांगायची. ते नीट कळत नव्हते तेव्हा आम्ही दुपारपर्यंत कंटाळून जायचो, आणि तिच्या ते लक्षात आले की ती आम्हाला जा म्हणून सांगायची, नाहीतर आम्हीच काहीतरी बहाणा सांगून सटकायचो. ऑफिसमध्ये असताना अनेकदा कोणाचे लक्ष नाही पाहून कंप्युटरवर गेम्स सुद्धा खेळलो. पण जेव्हा ती साईटवर घेऊन जायची तेव्हा छान वाटायचे. जे वाचतो, लिहतो ते प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय नीट समजत नाही. हळूहळू कळायला लागले वाचलेले आणि मग रिपोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट यायला लागला. 
ट्रेनिंगशिवाय या सुट्टीत बरेच काही केले. एकत्र स्वयंपाक करायला मजा यायची. मला अजूनही नेहमी आठवते. चंचल किंवा अपर्णा काहीतरी बनवत असतील तेव्हा मी ओट्यावर चढून बसायचे. किचनचा ओटा L आकाराचा होता, त्याच्या मोठ्या लांब बाजूला शेगडी होती आणि  छोट्या बाजूवर पाण्याची भांडी असायची. सरकवा-सरकवी करून मी तिथे बसायला थोडी जागा करायचे. आणि मग निवांत बसून मी खूपवेळ बडबड बडबड करत राहायचे. रात्री जेवल्यानंतर कितीही कंटाळा आला असला तरी, झोप येत असली तरी आम्ही पत्ते खेळल्याशिवाय झोपायचो नाही. सुट्टी होती ना ती मग खेळायला नको का?म्हणून फक्त! दरम्यान चंचलचा वाढदिवस आला. केक फुगे वगैरे आणून मस्त साजरा केला. एक दिवस घारापुरीची लेणी (एलिफंटा केव्ह्स) पाहायला गेलो. बोटीतला प्रवास, पाऊस, मक्याचे कणीस, फोटो,खरेदी… मस्त दिवस होता तो!  या सुट्टीतील काही फोटो एकत्र… 

  • जून २०१३
मुंबईतला मुसळधार पाऊस पाहिला तो या जूनमध्ये. फिल्ड ट्रेनिंगसाठी खऱ्या अर्थाने फिल्डवर दाखल झालो होतो. एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ट्रेनिंग घेत होतो. Raw material warehouse आणि finished goods warehouse चे बांधकाम चालू होते तळोजा MIDC मध्ये. इथे ट्रेनिंगला पुन्हा आम्ही त्याच तिघी. पण यावेळी एकत्र राहत नव्हतो. मी माझ्या काकांकडे मानखुर्दला, चंचल तिच्या मामांकडे कल्याणला आणि अपर्णा अर्थातच तिच्या स्वत:च्या घरी डोंबिवलीला (आमच्या शिवाय आणखी तिघीही होत्या, पण त्यांचे NDT मध्ये ट्रेनिंग चालू होते. त्या अपर्णाकडे राहिल्या).  तळोजाला जाण्यासाठी त्या दोघींना कल्याणहून थेट तळोजापर्यंत बस होती. मला मात्र मजल दरमजल करत यावे लागायचे. मानखुर्द ते खांदेश्वर लोकलने. खांदेश्वरला उतरल्यावर कळंबोली हायवेपर्यंत मी ३.५- ४ किमी. चालत जायचे. तिथे रिक्षा होत्या पण त्यांना रोज ७०-८० रु. देणे मला परवडणारे नव्हते. आणि तिथून शेअर रिक्षा नसायच्या. मग हायवेपासून MIDC पर्यंत six seater ने. आमची साईट शेवटच्या टोकाला होती. त्यामुळे त्या गाडीत बसलेला पहिला आणि उतरणारा शेवटचा प्रवासी मीच असायचे. साधारण ११ ते ५ असे ट्रेनिंग झाल्यावर आम्ही निघायचो तेव्हा मात्र मी चंचल आणि अपर्णासोबत कल्याणपर्यंत बसने आणि तिथून लोकलने मानखुर्द असे फिरून जायची. कारण पुन्हा ४ किमी चालण्याचे त्राण असले तरी अंधारात त्या रस्त्याने एकटी चालत जाण्यात धोका होता.
साईटवरील इंजिनिअर चांगले मार्गदर्शक होते, शिवाय ते आमच्याच कॉलेजमधील होते. प्रोजेक्ट व्यवस्थापकांनी सुद्धा खूप मदत केली. नवनवीन गोष्टी आम्हाला शिकवल्या. सर्वेईंग करताना फार मजा आली. फ्लोर लेवल फिक्स करायची होती. आणि आमच्या गाईडनी सेट केलेली ऑटो लेवल थोडी उंच होती. त्यातून पाहायला माझी उंची कमी असल्यामुळे पायाखाली विटा मांडून मला पाहावे लागायचे. साईटवर सुरक्षिततेसाठी आम्ही जेव्हा सेफ्टी शूज, हेल्मेट, जाकेट घालायचो तेव्हा उगाचच स्वत:चा अभिमान वाटायचा.

दरम्यान रविवारी सुट्टी म्हणून आम्ही सर्व मैत्रिणी चंचलच्या मामांकडे गेलो होतो. जेवणे आटोपली आणि बाकीच्या सर्वजणी अपर्णाच्या घरी गेल्या. मी चंचलच्या इथेच राहिले. दुसऱ्या दिवशी आम्ही साईटवर जाऊ आणि मग संध्याकाळी मी पुन्हा माझ्या काकांकडे… असे ठरले हते. पण त्यादिवशीच पाऊस जो सुरु झाला ते सलग ३ दिवस चालूच होता. आम्ही साईटवर ही गेलो नाही, घरातून बाहेरच पडलो नाही. तेव्हाच उत्तर भारतात ढगफुटी झाली होती. आणि दिवसभर त्याच्या बातम्या, मुलाखती टिव्हीवर चालू होत्या. चौथ्या दिवशी पावसाने रजा घेतली आणि मग आमचे काम पूर्ववत झाले. या पावसामुळे मात्र आम्हाला त्या सुट्टीत कुठेही फिरता आले नाही. पण तरीही हा अनुभव बरेच काही शिकवून गेला आणि आम्हाला समृद्ध करून गेला.

त्यानंतरचे अनुभव पुढच्या भागात… 

Wednesday, 1 June 2016

सामान्यांतले असामान्यत्व

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. जगावेगळ्या असणाऱ्या व्यक्तींच्या कार्यावर त्यामार्फत प्रकाश पाडला जात आहे. लेखक अरविंद जगताप यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे की ते अशा व्यक्तींचा शोध घेत आहेत. त्यामध्ये त्यांनी डॉ. हेमा साने आणि शांताबाई यादव या दोन अफलातून स्त्रियांची ओळख करून दिली. 
डॉ. साने यांनी आजवरच्या त्यांच्या आयुष्यात वीज वापरली नाही. ७५ वर्षे वीजेशिवाय त्या कशा राहू शकल्या असतील हा प्रश्न आजकाल मोबाईलशिवाय १० मिनिटे राहू न शकणाऱ्या मुलांना पडलाच पाहिजे. त्या जीवशास्त्र या विषयातील डॉक्टर आहेत आणि त्या विषयातील अनेक पुस्तकांचे  लेखनही त्यांनी केले आहे. वीजच नाही वापरत तर पंखा, टिव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, कुलर, मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींमागील पैशाचा आणि वेळेचा किती अपव्यय त्यांनी टाळला आहे, कल्पनाही करता येत नाही. आपल्या गरजा किमान असाव्या असे  मी खूपवेळा वाचले आहे, ऐकले आहे पण  हे प्रत्यक्षात जगणारी ही एकच व्यक्ती आजवर पाहिली.
दुसरी व्यक्ती म्हणजे शांताक्का, पतीच्या निधनानंतर चार मुलींची जबाबदारी एकटीवर पडलेली असताना जिद्दीने परिस्थितीला सामोरी गेलेली ही हिरकणीच. शेतीवाडी नाही, जमीनजुमला नाही मग करायचे काय असा प्रश्न असताना त्या रडत बसल्या नाहीत तर पतीचा दाढी-कटिंग चा व्यवसाय त्यांनी पुढे ३५ वर्षे चालू ठेवला. आजही त्या कोणापुढेही हात पसरत नाहीत, तोच व्यवसाय करून उपजीविका करतात. एका महिलेकडून खेडेगावात दाढी करून घेण्याचे पहिले पाऊल गावच्या सभापतींनी उचलले म्हणून बाकी लोकांनाही त्यात काही गैर नाही हे पटले असावे. याच व्यवसायाच्या मदतीने या माउलीने आपल्या चार मुलींच्या लग्नाचा खर्च पेलला.
Pg_1_2_1S
समाजात काही व्यक्ती थोड्या वेगळ्या असतात, काहीतरी चांगले करत असतात पण त्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही , किंबहुना प्रसिद्धीसाठी त्या काम करत नसतातच मुळी. काहीजण जगण्याचे तत्व म्हणून, काहीजण गरज म्हणून तर काही आपल्या आचरणातून जगाला चांगला संदेश द्यायचा म्हणून इतरांहून वेगळे आयुष्य जगत असतात. चाकोरीच्या बाहेर जाऊन वाटा धुंडाळत असतात. तसे पाहायला गेले तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण असते. आपल्या आजूबाजूलाही अशा व्यक्ती असतात पण त्यांचे मोठेपण सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. कारण एकतर त्यांचा तसे वागण्यामागचा विचार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नसू अथवा  डोळ्याला झापडे लावून बसत असू. किंवा अगदीच विचित्र किंवा विक्षिप्त माणूस असेही कधी कधी लेबल देत असू. या व्यक्ती फार मोठे काही काम करत नसतीलही, पण अनेक छोट्या गोष्टीं विशिष्ठ पद्धतीने करताना फार मोठे विचार त्यामागे असू शकतात. या लोकांचे वागणे, त्यांचे विचार आपल्याला समजून घेता आले पाहिजेत.
नाना पवार हे असेच एक व्यक्तिमत्व. कराडला कॉलेजला असताना अनेकदा प्रीतीसंगमावर जाणे व्हायचे. एकदा त्यांची भेट झाली. ते गेली कित्येक वर्षे दररोज पक्षी आणि माशांसाठी खाऊ घेऊन येतात. सुरुवात त्यांनी एकट्याने केली असली तरी आता अनेक हात त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. दुपारी उन्हे उतरायला लागल्यावर ते सायकलला पिशव्या अडकवून घरातून निघतात आणि दुकाने, हॉटेल, खाऊच्या गाड्यांवरून आणि घराघरांतून लोक देतील ते जमा करून कृष्णा- कोयनेच्या संगमावर येतात. कृष्णामाईची आरती करून, मासे आणि पक्ष्यांसाठी आणलेले अन्न किनाऱ्यावर आणि पाण्यात सोडून ते जातात. पक्ष्यांनाही याची एवढी सवय झालेली आहे की तिन्हीसांजेला संगमावर कोणत्याही निमंत्रणाशिवाय सगळे पक्षी जमा होतात.



खरेच किती सातत्याने त्यांचे हे व्रत अखंड चालू आहे, विशेष कौतुक वाटते मला या माणसांचे.

माझी आजी एकदा मला रागावली होती ते सहज आत्ता या निमित्ताने मला आठवले. मी तांदूळ की गहू काहीतरी निवडत होते आणि खडे काढून टाकताना त्यातील साळी(टरफल न निघालेले धान्य) फेकून देत होते. आजी मला रागावताना म्हणाली "अग जे तू कचऱ्यात टाकून देतेयस तेवढ्यावर लहान मोठ्या किमान २५ जीवांची भूक भागली असती", एका छोट्या प्रसंगातून तिने मला केवढी महत्वाची गोष्ट शिकवली होती ते आज लक्षात येते. तो बालमनावर केलेला संस्कार होता, तो रुजला. त्यामुळेच आजकाल जेव्हा होस्टेलमध्ये रोज मुलींनी ताटातून खरकटे टाकलेले अन्न  शेकडो किलोने वाया जाताना पाहते तेव्हा जीव तुटतो.
आदर्श ठेवण्यासाठी, धडे गिरवण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी प्रत्येक वेळी झाशीची राणी, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, डॉ. कलाम, इंदिरा गांधी किंवा अल्बर्ट आईनस्टाईन यांचीच चरित्रे वाचली पाहिजेत असे काही नाही. ही मोठी माणसे आपल्याला खूप काही शिकवून गेली आहेतच पण आपल्याच घरात आपली आई किंवा शेजारी राहणारे काका, शेवटच्या बाकावर बसलेला आपलाच मित्र हेही तितकंच मोलाचं काही आपल्याला सांगू पाहात असतात. आपल्याला ते डोळसपणे पाहता आले पाहिजे आणि नम्रपणे ऐकता आले पाहिजे. भल्या  माणसांच्या अशा छोट्या छोट्या कृतींमधून आपल्याला काही शिकता आले, प्रेरणा घेता आली तर आणखी काय हवे, नाही का?