Thursday, 18 August 2016

सहजीवन

१५-२० दिवसांपूर्वी आमच्या शेजारचे एक आजोबा गेले. तसे आजारीच असायचे आणि बरेच थकलेलेही होते. घरी फोन व्हायचा तेव्हा मी कधीच त्यांची चौकशी केली नव्हती. नेमकं त्या दिवशी आई सांगत होती की नारळपाणी पिऊनच त्यांची तब्येत सुधारली होती वगैरे...आणि आमचे एवढे बोलणे झाले त्याचदिवशी दुपारी ते निर्वतले. तसे त्यांच्याबद्दल लिहावे अशी त्यांची माझी ओळखही नाही, किंवा त्यांची ख्यातीही नाही. पण आज सहज विचार आला तो त्यांच्या बायकोचा. त्यांच्या दुसऱ्या बायकोचा.
आजोबांना दोन बायका. पहिलीला सहा मुली झाल्या, मुलगा होईना म्हणून दुसरीशी लग्न केले. त्यानंतर मुलगा झाला पण तो पहिल्याच बायकोला. दुसरी आजोबांची लाडकी होती, पण तिला मूल झालेच नाही. मुलींची लग्न झाली, मुलगा आपल्या आईला घेऊन वेगळा राहायला लागला, कारण वेगळे काय असणार? कौटुंबिक कलह! पण कसल्याशा तडजोडीने ते मिटले असावेत.  काही दिवसांनी आजोबाही आले दुसऱ्या बायकोसोबत  यांच्याकडेच राहायला. मुलाचे लग्न झाले पण सुनेचे दोघींशीही फार काही पटले नाही कधीच. पण आम्हाला दया यायची ती पहिल्याच बायकोची. बिचारी थकलेली पण स्वभावाने गरीब, दिवसभर राबायची. तिचे दुखनेखुपणे कोणी पाहत नव्हते. आमच्याघरी येऊन कधीमधी आईकडे मन मोकळे करायची. आमच्या घरी येणे जाणे असायचे, विचारपूस व्हायची.
दुसऱ्या बायकोशी मात्र आमचा संवाद कमीच. कामापुरते काम. आपल्याकडे आधीच दोन लग्ने झालेल्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि त्यातून दुसऱ्या बायकोचा तर दुस्वासच जास्त. पण का कुणास ठावूक.. आजोबा गेले आणि दुसऱ्या बायकोबद्दलच मला जास्त वाईट वाटू लागले. पहिली थकलेली आहे, वृद्ध आहे. तिचेही आयुष्य आता फार नाही राहिले शिवाय तिला स्वत:च्या पोटच्या मुली, मुलगा नातवंडे आहेत. उरलेसुरले आयुष्य काढेल ती कसेही. पण नवरा गेल्याचे दु:ख दुसरीला किती झाले असेल कल्पना करता येणार नाही. एकतर घरात जिवाभावाचा माणूस तेवढाच आणि अर्धे आयुष्य सरले असले तरी उरलेलेही खूप आहे. पोटचे एखादे मूल असते तर त्याच्याकडे पाहत दिवस काढले असते. पण आता किती म्हटले तरी थोरलीच्या पोरी लावतील का जीव आपल्याला? नवऱ्याचा धाक घरात नसला तरी अस्तितवानेही फरक पडतो. तो असताना जो मान होता तो राहील का पुढे? आपल्या जन्माचे प्रयोजन काय हा प्रश्न सतावत असेल ना तिला आता!  

बहिण- भावाचं नातं



माझ्या आजीच्या जात्यावरील ओव्यांमध्ये बहिण- भावाचं नातं सांगणाऱ्या ओळी सापडल्या..त्या सादर करायला आजच्याइतका चांगला दुसरा मुहूर्त नाही.
इठू सावळा बंधू येवो
म्या का देखली दरवाज्यात,
हाती चंदनाचा पाट
झारी बुडविली रांजणात,
बंधूच्या भोजनाला
जिरं-साळीचा करती भात,
हिंग-जीऱ्याचं तिखट
भाजी यीळती तीनशे साठ,
झालं बंधूचं भोजन
चंद्रभागेचं पाणी टाक,
हातही पुसायला
शेला धुवट बारीक,
पिकल्या पानाचं देठ तोडी
चिकणी सुपारी चिकट,
दारी दवण्याचं झाड
चुना कळीचा तिखट,
गेला मातेला सांगत
बहिण असावी जलमात...
सर्व बहिण भावांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!!