Wednesday, 1 June 2016

सामान्यांतले असामान्यत्व

झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात एक नवीन उपक्रम सुरु केला आहे. जगावेगळ्या असणाऱ्या व्यक्तींच्या कार्यावर त्यामार्फत प्रकाश पाडला जात आहे. लेखक अरविंद जगताप यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे की ते अशा व्यक्तींचा शोध घेत आहेत. त्यामध्ये त्यांनी डॉ. हेमा साने आणि शांताबाई यादव या दोन अफलातून स्त्रियांची ओळख करून दिली. 
डॉ. साने यांनी आजवरच्या त्यांच्या आयुष्यात वीज वापरली नाही. ७५ वर्षे वीजेशिवाय त्या कशा राहू शकल्या असतील हा प्रश्न आजकाल मोबाईलशिवाय १० मिनिटे राहू न शकणाऱ्या मुलांना पडलाच पाहिजे. त्या जीवशास्त्र या विषयातील डॉक्टर आहेत आणि त्या विषयातील अनेक पुस्तकांचे  लेखनही त्यांनी केले आहे. वीजच नाही वापरत तर पंखा, टिव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, कुलर, मोबाईल यासारख्या अनेक गोष्टींमागील पैशाचा आणि वेळेचा किती अपव्यय त्यांनी टाळला आहे, कल्पनाही करता येत नाही. आपल्या गरजा किमान असाव्या असे  मी खूपवेळा वाचले आहे, ऐकले आहे पण  हे प्रत्यक्षात जगणारी ही एकच व्यक्ती आजवर पाहिली.
दुसरी व्यक्ती म्हणजे शांताक्का, पतीच्या निधनानंतर चार मुलींची जबाबदारी एकटीवर पडलेली असताना जिद्दीने परिस्थितीला सामोरी गेलेली ही हिरकणीच. शेतीवाडी नाही, जमीनजुमला नाही मग करायचे काय असा प्रश्न असताना त्या रडत बसल्या नाहीत तर पतीचा दाढी-कटिंग चा व्यवसाय त्यांनी पुढे ३५ वर्षे चालू ठेवला. आजही त्या कोणापुढेही हात पसरत नाहीत, तोच व्यवसाय करून उपजीविका करतात. एका महिलेकडून खेडेगावात दाढी करून घेण्याचे पहिले पाऊल गावच्या सभापतींनी उचलले म्हणून बाकी लोकांनाही त्यात काही गैर नाही हे पटले असावे. याच व्यवसायाच्या मदतीने या माउलीने आपल्या चार मुलींच्या लग्नाचा खर्च पेलला.
Pg_1_2_1S
समाजात काही व्यक्ती थोड्या वेगळ्या असतात, काहीतरी चांगले करत असतात पण त्यांना फारशी प्रसिद्धी मिळत नाही , किंबहुना प्रसिद्धीसाठी त्या काम करत नसतातच मुळी. काहीजण जगण्याचे तत्व म्हणून, काहीजण गरज म्हणून तर काही आपल्या आचरणातून जगाला चांगला संदेश द्यायचा म्हणून इतरांहून वेगळे आयुष्य जगत असतात. चाकोरीच्या बाहेर जाऊन वाटा धुंडाळत असतात. तसे पाहायला गेले तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण असते. आपल्या आजूबाजूलाही अशा व्यक्ती असतात पण त्यांचे मोठेपण सहजासहजी आपल्या लक्षात येत नाही. कारण एकतर त्यांचा तसे वागण्यामागचा विचार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नसू अथवा  डोळ्याला झापडे लावून बसत असू. किंवा अगदीच विचित्र किंवा विक्षिप्त माणूस असेही कधी कधी लेबल देत असू. या व्यक्ती फार मोठे काही काम करत नसतीलही, पण अनेक छोट्या गोष्टीं विशिष्ठ पद्धतीने करताना फार मोठे विचार त्यामागे असू शकतात. या लोकांचे वागणे, त्यांचे विचार आपल्याला समजून घेता आले पाहिजेत.
नाना पवार हे असेच एक व्यक्तिमत्व. कराडला कॉलेजला असताना अनेकदा प्रीतीसंगमावर जाणे व्हायचे. एकदा त्यांची भेट झाली. ते गेली कित्येक वर्षे दररोज पक्षी आणि माशांसाठी खाऊ घेऊन येतात. सुरुवात त्यांनी एकट्याने केली असली तरी आता अनेक हात त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत. दुपारी उन्हे उतरायला लागल्यावर ते सायकलला पिशव्या अडकवून घरातून निघतात आणि दुकाने, हॉटेल, खाऊच्या गाड्यांवरून आणि घराघरांतून लोक देतील ते जमा करून कृष्णा- कोयनेच्या संगमावर येतात. कृष्णामाईची आरती करून, मासे आणि पक्ष्यांसाठी आणलेले अन्न किनाऱ्यावर आणि पाण्यात सोडून ते जातात. पक्ष्यांनाही याची एवढी सवय झालेली आहे की तिन्हीसांजेला संगमावर कोणत्याही निमंत्रणाशिवाय सगळे पक्षी जमा होतात.



खरेच किती सातत्याने त्यांचे हे व्रत अखंड चालू आहे, विशेष कौतुक वाटते मला या माणसांचे.

माझी आजी एकदा मला रागावली होती ते सहज आत्ता या निमित्ताने मला आठवले. मी तांदूळ की गहू काहीतरी निवडत होते आणि खडे काढून टाकताना त्यातील साळी(टरफल न निघालेले धान्य) फेकून देत होते. आजी मला रागावताना म्हणाली "अग जे तू कचऱ्यात टाकून देतेयस तेवढ्यावर लहान मोठ्या किमान २५ जीवांची भूक भागली असती", एका छोट्या प्रसंगातून तिने मला केवढी महत्वाची गोष्ट शिकवली होती ते आज लक्षात येते. तो बालमनावर केलेला संस्कार होता, तो रुजला. त्यामुळेच आजकाल जेव्हा होस्टेलमध्ये रोज मुलींनी ताटातून खरकटे टाकलेले अन्न  शेकडो किलोने वाया जाताना पाहते तेव्हा जीव तुटतो.
आदर्श ठेवण्यासाठी, धडे गिरवण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी प्रत्येक वेळी झाशीची राणी, छत्रपती शिवाजी, महात्मा गांधी, डॉ. कलाम, इंदिरा गांधी किंवा अल्बर्ट आईनस्टाईन यांचीच चरित्रे वाचली पाहिजेत असे काही नाही. ही मोठी माणसे आपल्याला खूप काही शिकवून गेली आहेतच पण आपल्याच घरात आपली आई किंवा शेजारी राहणारे काका, शेवटच्या बाकावर बसलेला आपलाच मित्र हेही तितकंच मोलाचं काही आपल्याला सांगू पाहात असतात. आपल्याला ते डोळसपणे पाहता आले पाहिजे आणि नम्रपणे ऐकता आले पाहिजे. भल्या  माणसांच्या अशा छोट्या छोट्या कृतींमधून आपल्याला काही शिकता आले, प्रेरणा घेता आली तर आणखी काय हवे, नाही का?  

1 comment:

  1. खूप प्रेरणादायी...! छान लेखन.

    ReplyDelete