Saturday, 2 May 2020

एकमेकांना बळ देऊया



प्रिय आई बाबा यांस
पत्र लिहण्यास कारण की आज त्याची नितांत गरज आहे आणि पुढे ते जपून ठेवता येईल, त्याची आठवण पुढच्या वर्षी, चार वर्षांनी, दहा वर्षांनीही तेवढीच राहील आणि त्यावेळी आपल्याला एकमेकांचा अभिमान वाटेल.
तुम्ही कसे आहात? मी कशी आहे? तुम्हीही बरे आहात, मीही बरी आहे, खाऊन पिऊन ठणठणीत आहे हे आपण रोज एकमेकांशी फोनवर किंवा whats app video call वर बोलून पाहून एकमेकांना कळत असते, ते पत्रातून सांगण्याची तशी गरज नाही. गरज आहे ती एकमेकांच्या अव्यक्त चिंता, काळजी किंवा भावना व्यक्त करण्याची आणि एकमेकांना धीर देण्याची.
Covid-19 म्हणजेच कोरोना विषाणूशी संपूर्ण जग लढा देत असताना आपल्याला एकमेकांची काळजी वाटते आणि ते साहजिकच आहे.सुदैवाने हॉस्पिटल्स, पोलीस यंत्रणा आणि प्रशासन आपली काळजी घेण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत, अशावेळी आपण त्यांना सहकार्य करावे आणि आहोत तिथेच आपापल्या जागी राहून कोरोना संक्रमण टाळावे एवढीच अपेक्षा आपल्याकडून केली जात आहे.
तुम्हाला माझी काळजी वाटते कारण मी आज मुंबईमध्ये red zone मध्ये राहते. इथे आजूबाजूला containment zones आहेत. तुम्हाला काळजी वाटते कारण तुम्ही मला जन्म दिला आहे, वाढवले आहे आणि तुमच्यासाठी मी कायमच लहान बाळ असणार आहे पण आज मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते की मी आता 27 वर्षाची आहे, माझे इथे स्वत:चे घर आहे, मला आठवड्यातून 1 दिवस सुरक्षिततेचे योग्य नियम पाळून भाजी आणता येत आहे, तुम्ही मला घडवताना स्वावलंबी केले आहे, संकटांना सामोरे जायला शिकवले आहे आणि आता जेव्हा या गोष्टींना तोंड द्यायची वेळ आली आहे तेव्हा तुम्ही घाबरत आहात आणि काही अंशी मलाही कमजोर करत आहात.
घरी येण्याची इच्छा मलाही तितकीच आहे पण त्याहून जास्त काळजी मला या गोष्टीची आहे की चुकून मला कोरोनाची लागण झालेली असेल आणि मी घरी आले आणि home quarantine जरी झाले तरी माझ्यामुळे तुम्हाला कोरोनाचा त्रास होऊ शकतो आणि तो होऊ नये म्हणून मी घरी यायला तयार नाही. मला काळजी वाटते कारण तुम्ही माझे आई बाबा आहात, आता तुम्ही दोघांनीही वयाची पन्नाशी- साठी ओलांडली आहे आणि तुम्ही निरोगी राहावे अशी माझी इच्छा आहे.
देशात बऱ्याच ठिकाणी मुंबई पुण्यातून परवानगी घेऊन/न घेताही आपापल्या गावी गेलेल्या अशा cases आहेत की गावी गेल्यानंतर त्यांना लक्षणे दिसू लागली आणि नंतर ते corona positive आहेत असे समजले.
तुम्हाला आठवते का तुम्ही तुमच्या बालपणाच्या गोष्टी सांगताना किती कठीण परिस्थितीतही कष्ट करून तुम्ही कसे यशस्वी झाला ते सांगत होतात. दोन वेळच्या भाकरीचे वांदे होते, आज आम्ही lockdown मध्ये देखील 3 वेळेला ताजे अन्न खात आहोत, भाज्या संपल्या तर डाळी, सांडगे, चटण्या आहेतच. महिनाभराचा किराणा भरून ठेवलाय. डोक्यावर छप्पर आहे. मला जेवण बनवता येते ती गोष्ट वेगळी पण ज्यांना येत नसेल तर तो/ती काय खात असेल याची काळजी करण्यापेक्षा चार पदार्थ बनवायला शिकवण्याची आणि शिकण्याची हीच वेळ आहे.
फक्त तुम्हालाच नाही तर जगातल्या सर्व पालकांना माझी अशी विनंती आहे की मुलांना तुम्ही मोठे केले, शिकवले, स्वावलंबी केले आहे तर आज तुम्ही दिलेल्या शिकवणीच्या परीक्षेचा काळ आहे असे समजा आणि मुलांना लढू द्या, त्यांची काळजी करण्यापेक्षा त्यांना धीर द्या, नवीन गोष्टी करण्यास शिकण्यास प्रोत्साहन द्या, पण कृपया भावनिक होऊन त्यांना घरी बोलावू नका.
हे दिवसही लवकरच जातील आणि तुम्ही एकमेकांना भेटू शकाल.
दुसरी गोष्ट म्हणजे जसे मी तुमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करेन तसाच प्रयत्न राज्यातील देशातील प्रत्येकाने स्वत:पुरता विचार करत केला तर व्यवस्थेवर त्याचा ताण येईल आणि ज्यासाठी आपण हे टाळतोय तेच घडेल, आणि आपण जिंकत आलेली लढाई शेवटी शेवटी हरू, त्याची मला जास्त काळजी आहे. 80% लोकांमध्ये लक्षणे नसतानाही त्या लोकांचे reports corona positive आले आहेत.
अशावेळी जसे भावनिक होऊन मला माझ्या घरी जायचे आहे असा विचार मी केला नाही पाहिजे तसेच तुम्ही म्हणजे माझ्या आई बाबांनी माझी मुलगी घरी यायला पाहिजे असा विचार करता कामा नये.
ज्यांना घरदार नाही, जेवायला मिळत नाही, नोकरी नाही अशांची व्यवस्था प्रशासन प्राधान्यक्रमाने करत आहे, आणि ते गरजेचे आहे.
ज्यांना अजूनही शक्य आहे त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एकमेकांना वाचवूया, एकमेकांना बळ देऊया.
तुमचीच
छकुली

No comments:

Post a Comment