Thursday, 24 December 2015

नवे पर्व... नवा प्रवास...

२०१५ चे शेवटचे काही दिवस उरलेत … वर्ष सरताना नाही म्हटलं तरी गेलेल्या वर्षाचा मागोवा घेतला जातोच. या वर्षात अनेक महत्वपूर्ण गोष्टी घडल्या. माझ्यासाठी काही जग इकडचे तिकडे नाही झाले पण मला मिळालेली अनुभवाची शिदोरी नक्कीच मोठी आहे. 
                २०१४ ची जागृती यात्रा सुरु होती न त्या यात्रेसोबत मी उडीसाहून बिहारमधील नालंदा विद्यापीठाकडे प्रयाण करत असताना आम्ही ट्रेनमध्येच नवीन वर्षाचे स्वागत केले. त्याचदिवशी आम्ही आमच्या Water group तर्फे "save water" अर्थात "पाणी वाचवा" मोहीम राबवली. जागृती यात्रा उत्साहात पूर्ण केली आणि त्याचबरोबर नवीन लोकांशी मैत्रीही झाली. मला एक फ्रेंच मैत्रीण मिळाली
सुहानी… गुजरातमधील अहमदाबादहून यात्रेसाठी आलेली मुलगी माझी अगदी जवळची मैत्रीण झाली. अर्चना... एक हसतमुख सुंदर मुलगी मला आयुष्यभराची प्रेरणा व मार्गदर्शक म्हणून लाभली. जगावं तर तिच्यासारखं अशी मुलगी. 

त्यानंतरचा उल्लेखनीय प्रवास आणि अनुभव म्हणजे मलाजा… गुजरातच्या छोटा उदेपूर जिल्ह्यातील एक आदिवासी गाव … मी माझ्या मनाचा राजा, ना सवयीचा गुलाम, ना ही वेळेचा… अशी जीवनपद्धती असलेल्या राठवा कुटुंबात मी जगण्याची नवीन कला पाहत होते, शिकत होते, अनुभवत होते. दोन महिने रोज सकाळी आले, पुदिना किंवा गवतीचहा घालून बनवलेला कोरा चहा न चुकता समोर यायचा अन दिवसाची गोड सुरुवात व्हायची. हळद , मीठ, मिरचीची तेलात फोडणी देऊन केलेली कोणतीही भाजी आणि मक्याची भाकरी हेच रोजचे जेवण… कधी कधी आमटी-भात. आधी फक्त हातवारे करून सुरु झालेला संवाद हळूहळू शब्दांमध्ये व्हायला लागला. त्यांना आपली भाषा शिकवण्यापेक्षा त्यांचीच भाषा बोलणे सोप्पे पडले. माझ्या 'राठवी शब्दकोशा'त रोज २-४ शब्दांची भर पडू लागली. तिथे मला भेटलेली माझी माणसे म्हणजे भूरीबेन आणि विरीयाभाई. ते कधी माझे दादा-दादी झाले कळलेच नाही.
 
जगणे हे आपले उत्तरदायित्व आहे हे मी त्यांच्याकडून शिकले. दादीबद्दल मी या आधीही सविस्तर लिहले आहे. 

आनंदवनला भेट देण्याची माझी इच्छाही याच वर्षाच्या उत्तरार्धात पूर्ण झाली. जगण्याचं बळ मिळतं या प्रकल्पाला भेट दिल्यावर. बाबा आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खूप मोठे व्रत घेतले आहे. या कार्यात कोणत्याही रूपाने मला हातभार लावता आला तर मी माझे भाग्य समजेन. सहा वर्षांपूर्वी भेटलेल्या माझ्या अर्चूताईला मी या निमित्ताने पुन्हा भेटले. तिच्यासोबत तिच्या घरी असताना मला आपल्याच घरी असल्यासारखं वाटलं. तिच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे.

 हे सर्व पाहिलं की जाणवतं अजून खूप काही करायचं बाकी आहे आपलं… अखंड चालायला हवं…
              त्या प्रेरणेमुळेच की काय पण याच वर्षात मी एक नवीन प्रवास सुरु केला. दूर राहणारा पण सदैव सोबत असणारा कार्तीदादा भेटला मला. त्याच्या सोबतीने आणि निमित्ताने मी एका लहान मुलाच्या शिक्षणासाठी माझ्या परीने मदत करायला लागले. आपल्याला आपल्या आई-बाबांकडून खूप काही मिळाले, अगदी कशाचीच उणीव भासली नाही. मग एका होतकरू आणि गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी आपला थोडा हातभार लागला तर आपल्याच जन्माचे सार्थक होईल. याचे श्रेय मात्र माझ्या या दादालाच. 
               प्रवास… कोणताही असो मग , प्रवासाची विलक्षण आवड असलेली मी या वर्षातील काही थरारक अनुभवांमुळे मात्र  थोडी वैतागले. अनपेक्षित अंगावर आलेल्या काही प्रसंगांमुळे माणूस घाबरतो… मीही थोडी घाबरलेच. सुट्टी असेल, project चं काही काम असेल किंवा सण -समारंभ, घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाला प्रवास अपरिहार्य आहे.  त्यामुळे कुठेही थांबणे शक्य नाही… थांबले तरी पुढची मोठी झेप घेण्याकरता सिद्ध होण्यासाठी… सज्ज होण्यासाठी… काही दिवसांपूर्वीच Robert Frost ची एक कविता वाचनात आली.
Whose woods these are I think I know.   
His house is in the village though;   
He will not see me stopping here   
To watch his woods fill up with snow.   

My little horse must think it queer   
To stop without a farmhouse near   
Between the woods and frozen lake   
The darkest evening of the year.   

He gives his harness bells a shake   
To ask if there is some mistake.   
The only other sound’s the sweep   
Of easy wind and downy flake.   

The woods are lovely, dark and deep,   
But I have promises to keep,   
And miles to go before I sleep,   
And miles to go before I sleep.

                कितीही थांबावेसे वाटले तरी आपले इच्छितकार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा मैलांचा प्रवास करावाच लागेल. खूप आवडली मला ही कविता. नवीन वर्षात नव्या उत्साहाने नवीन प्रवासासाठी नव्या दिशेला जायला मी आता सिद्ध होत आहे.  तुम्हाला ही नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. तुमचाही हा प्रवास सुखाचा, आनंददायी आणि समृद्ध होवो.
चार वर्षांपूर्वी प्रवासात असतानाच मी लिहिलेली एक कविता….

प्रवास
कधी निसर्गाच्या सानिध्यात एकांतात
कधी आप्तेष्टांच्या सहवासात उत्साहात
प्रवास
कधी कधी आनंददायी रमणीय
तर कधी अगदीच कंटाळवाणा
प्रवास
कधी द्रुतगती मार्गाने सुसाट
कधी पायवाटेने अनवाणी
प्रवास
कधी नव्या दिशेचा शोध घेण्यासाठी
कधी मळलेल्या वाटाच पुन्हा तुडवण्यासाठी
प्रवास
     कधी फक्त मौज म्हणून
तर कधी त्याशिवाय गत्यंतरच नाही म्हणून
प्रवास
बसमधील असेल तर संपेल तासा- दोन तासांत
पण तरीही सुरूच राहील आयुष्याचा अखंड
प्रवास
जन्मापासून मृत्युपर्यंत माणसाच्या
की उत्पत्तीपासून लयापर्यंत ग्रह ताऱ्यांच्या ?
प्रवास
 एक कोडे याचे उमगलेच नाही मला
गणित सृष्टीचे सुटले का कुणाला?
प्रवास करताना विचार करते आयुष्याचा
की विचार करताना प्रवास करते आयुष्याचा?
~ मेघा


2 comments:

  1. Chhan ahe..!
    megha.. ek mantharleli prawasi ashich kahisi padavi dyavishi vatate.
    Tulapan Happy New Year.

    ReplyDelete